कृषिपंप बंद पडू लागले : पाण्याची पातळी खालावली, डाव्या कालव्याचे भिजत घोंगडे
आसगाव चौ. : भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. मात्र शेतीसाठी पाणी असेल तर बाणी करता येते असी पुरातन लोकांपासूनची म्हण आहे. वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात चौरास भाग बसला आहे. त्यातच २८ वर्षापासून गोसेखुर्द धरणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. याला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. धरणामुळे पाण्याचे झरे पुर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल खोल गेली. उजवा कालव्यांतर्गत काही किमी पर्यंत रब्बीचे उत्पादन घेण्याला सुरवात झाली. मात्र डाव्या कालव्याचे काम चुकीच्या पध्दतीने केल्याने त्याचे भिजत घोंगडे सुरु आहे. चौरासच्या विहिरी आटल्याने कृषी पंप बंद पडू लागले. शेवटच्या टप्प्यात असलेले धानपिक सुकण्याची वेळ आली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरलेले आहे.चौरासमधील आसगाव ते ढोलसर तसेच अन्य पट्यातील विहिरी आटल्याने कृषीपंप बंद पडत आहेत. आणखी पाणी लागेल या आशेने शेतकरी त्यावर काम करीत आहेत. पंरतु आडात नसेल तर पोहऱ्यात कुढून येईल अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे. बहुतेक धान पिक लोंबीवर आलेले आहे. शेवटच्या टप्प्यात कृषीपंप बंद पडत आहेत. कुठूणतरी पाणी पिकाला देण्याचा केवीलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अनेक एकर शेती शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी लढा देवून त्यांना मरु देणार नाही. असे आश्वासन देणारे शासन आता तर शेतकऱ्यांच्या उरावर येवून बसल्याची प्रचिती येत आहे.राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द धरण तात्काळ पूर्ण करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी डावा कालव्याबाबद गप्प का बसले आहेत? अशा प्रश्न शेतकरी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे काय चुकत आहे. उराशी पाणी पण पाण्याविना मरण असेच म्हणण्याची पाळी आली आहे. ऐवढे होऊनही बांधकामासाठी म्हणजेच विकास कामासाठी वाळूची गरज असल्याचे सांगून क्षमतेपेक्षा जास्त रेती (वाळू) उपसा अहोरात्र सुरुच आहे. भारत हा कृषीप्रधान देश असतांना कृषी क्षेत्राकडे दुर्लक्षच होत असल्याचे वाळू लिलावावरुन लक्षात येत आहे. माती लागेपर्यंत वाळू उपसा म्हणजे शेतकऱ्यांसाठी घातकच पर्याय ठरत आहे. शेतकरी धान पिक वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. विहिरी आणखी खोलवर नेवून शेवटच्या टप्यात असलेले धान वाचविण्यासाठी धावपड करीत आहेत. मात्र हेही प्रयत्न तोडके पडत आहेत. गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालवा सुरु झाला तर जमीनीत पाणी झिरपून पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. व शेतकरी धान पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करुन आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न केल्याने एकदा तयार झालेला डावा कालवा पुर्णत: उधळावा लागला. आता दुसऱ्यांदा त्याच्या बांधकामाची प्रतिक्षा सुरु आहे. हाच धरण व कालवा शेतकऱ्यांसाठी मरणाचा प्रश्न ठरला आहे. धान पिकाच्या शेतीला भेगा पडल्याने शेवटच्या टप्यात शेतकऱ्यांनी धान पिकाची आशा सोडावी लागत असल्याने पुन्हा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटल्या जाईल. मात्र आणेवारीच्या चुकीच्या पध्दतीने जिल्ह्याती चार तालुका वगळल्याने शेतकऱ्यांचा शासनाप्रती तीव्र रोष उत्पन्न होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाचविण्यासाठी डावा कालवा तात्काळ सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)