धानाचे चुकारे जुन्याच दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:16+5:30

नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे.

Rice payment paid at the same rate | धानाचे चुकारे जुन्याच दराने

धानाचे चुकारे जुन्याच दराने

ठळक मुद्दे२०५ कोटींची खरेदी : वाढीव दराने चुकाऱ्याचे आदेशच आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला २५०० रुपये क्विंटल भाव जाहीर करून तीन आठवडे उलटले तरी अद्यापही वाढीव दराने धानाचे चुकारे देण्याचे आदेशच प्रशासनाला प्राप्त झाले नाही. परिणामी जिल्ह्यात जुन्याच दराने धानाचे चुकारे होत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरत आहे. अडीच महिन्यात जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली असून जुन्या दराप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी रुपये आहे.
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाला १८१५ रुपये प्रतीक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरु होती. धानाला वाढीव भाव मिळावे अशी सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला होता. मोठ्या प्रमाणात धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर घेऊन पोहचले. त्या ठिकाणी अनंत अडचणींचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला.
जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. जुन्या भावाप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी ५४ लाख ३७ हजार ६१ रुपये आहे. त्यापैकी १५५ कोटी ७१ लाख ६३ हजार २८० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराने आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी आशा होती. परंतु शासनाने जुन्याच म्हणजे १८१५ रुपये या हमीभावानेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. बोनस आणि वाढीव दराचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.
वाढीव दराची घोषणा होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. परंतु अद्यापही वाढीव दराने चुकारे करण्याबाबतचे आदेश धान खरेदी केंद्रावर पोहचले नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात जुन्याच दराने पैसे टाकले जात आहेत. शासनाने घोषित केलेल्या वाढीव दराने पैसे द्यावे अशी मागणी केली जात आहे. मात्र आदेश नसल्याने याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.

५० कोटींचे चुकारे प्रलंबित
१ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे प्राप्त झाले नाहीत. ४९ कोटी ८२ लाख ७३ हजार ७८० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असून तात्काळ पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु अनेक शेतकरी अद्यापही चुकाऱ्यापासून वंचित आहेत.

Web Title: Rice payment paid at the same rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.