कार्यादेशानंतर घेतला नगरपालिकेने ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:50 IST2017-08-11T23:49:59+5:302017-08-11T23:50:48+5:30
नगर पालिकेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेसमोर १२१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे.

कार्यादेशानंतर घेतला नगरपालिकेने ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नगर पालिकेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेसमोर १२१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी या कामाचा ठराव घेण्यापूर्वीच वर्क आॅर्डर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे ध्वजस्तंभ उभारण्यात येत असताना दुसरीकडे शहरावासीयांना मूलभूत सुविधा पुरवा, अशी मागणी समोर येत आहे.
भंडारा नगर परिषद कार्यालयासमोर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी १२१ फूट ध्वजस्तंभ उभारण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. १५ आॅगस्ट रोजी या ध्वजाचे लोकार्पण होणार आहे. स्वातंत्र्य दिवस जवळ येत आहे तशी या प्रक्रियेतील गुंतागुंत वाढत आहे. या ध्वजस्तंभ उभारणीच्या विविध तीन कामांसाठी निविदा काढण्यात आली होती. यात गांधी चौकातील रस्त्याचे रूंदीकरण, ध्वजस्तंभ उभारणीकरीता पाया तयार करणे आणि ध्वजस्तंभ उभारणे या कामांचा समावेश होता.
१० दिवसात पाया उभारणीचे कंत्राट ८९,३५१ रूपयांचे, १२ दिवसात ध्वजस्तंभ उभारणीचे कंत्राट १४ लाख ५० हजार रूपयांचे तर १५ दिवसात गांधी चौकातील रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी ३७ लाख ६७ हजार ६६० रूपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले. या बांधकामांचे कार्यादेश संबंधित कंत्राटदारांना अनुक्रमे २५ जुलै, २ आॅगस्ट आणि ३ आॅगस्टला देण्यात आले. परंतु यासंबंधीचा ठराव मात्र ८ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष साधारण सभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे ध्वजस्तंभ उभारण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
विरोधक म्हणतात, सभागृहाची अवमानना
मुख्याधिकाºयांनी सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यापूर्वी कार्यादेश देण्याची गरज नव्हती. ठरावापूर्वीच कार्यादेश देणे सभागृहाचा अवमान आहे. मुख्याधिकाºयांनी लिहीलेल्या टिपणीमध्ये सदर कामाला मंजुरी देण्यात आली असून कार्याेत्तर मंजुरी देण्यात यावी, अशी माहिती सभागृहात देण्याची गरज होती, असे विरोधकांचे म्हणने आहे.
‘त्या’ कामाचे देयके रोखले होते
तत्कालीन नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांच्या कार्यकाळात एका रस्त्याच्या कामाचे कार्यादेश ठरावापूर्वीच देण्यात आले होते. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या कामाचे देयके अद्याप निघालेले नाही. हे काम सुद्धा त्याच धर्तीवर होत असल्यामुळे या कामांचे देयके कोणत्या आधारावर देण्यात येईल, याकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक अॅड.विनयमोहन पशिने यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले.
ध्वजस्तंभ उभारणीच्या कामात कोणतीही अनियमितता नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे काम सुरू आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतरच हे काम सुरू करण्यात आले. विरोधकांचे आरोप तथ्यहीन असून वस्तुस्थिती समोर आहे.
- अनिल अढागळे, मुख्याधिकारी, भंडारा.
नगराध्यक्षांना भंडाºयाची पताका उंचावायची होती तर हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजस्तंभ उभारता आला असता. त्यानिमित्ताने हुतात्मा स्मारक परिसराला पर्यटनाचा स्वरूप आले असते. हौतात्मय पत्करलेल्या वीरपुत्रांचे स्मरण त्याठिकाणी करता आले असते आणि ध्वजस्तंभ पाहायलाही नागरिक तिथे गेले असते. परंतु वर्दळीच्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभारून वाहतुकीच्या कोंडीत भर पडणार आहे.
- सुर्यकांत ईलमे, माजी नगरसेवक भंडारा.