राष्ट्रसंतांच्या भंडारा स्मृती

By Admin | Updated: May 1, 2017 00:26 IST2017-05-01T00:26:24+5:302017-05-01T00:26:24+5:30

सबके लिए खुला है मंदिर यह हमारा!

Rashtrasants' Bhandara Memorial | राष्ट्रसंतांच्या भंडारा स्मृती

राष्ट्रसंतांच्या भंडारा स्मृती

सन १९३३ ते १९६८ चा प्रवास : गुरूदेव सेवा मंडळाचे अविरत कार्य
प्रशांत देसाई भंडारा
सबके लिए खुला है मंदिर यह हमारा!
मतभेद को भूला है मंदिर यह हमारा !!
मानव का धर्म क्या है, मिलती है राह जिसमे!!
चाहत भला सभी का, मंदिर यह हमारा!!
मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओजस्वी खंजिरी भजनातून हे संदेश सर्वासाठी प्रेरणादायी होते. अशा या ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या पदस्पर्शाने भंडारा जिल्हा पावन झाला आहे. रविवारला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम असल्याने भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या वास्तव्याच्या या काही आठवणी...
लाखांदूर आगमन
भंडारा जिल्ह्यात त्यांचे पहिल्यांदा १९३३ मध्ये आगमन झाले. शेकडो धार्मिक प्रचारक निर्माण करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रचारकांचा वर्ग आयोजित करण्यात येत होता. महाराजांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून १५ मे १९४४ ते ३० मे १९४४ पर्यंत धार्मिक प्रचारकांचा वर्ग घेण्यात आला. या वर्गात पूर्व विदर्भ व छत्तीसगढ येथून सुमारे २०० प्रचारकांनी हजेरी लावली. या वर्गात स्वागतपद्धती, रामधून, धर्म आदी विषय अत्यंत सोप्या भाषेत गुरूदेवांनी समजावून सांगितले. लाखांदूर येथे जुलै १९४५ मध्ये धार्मिक सप्ताह समारंभाप्रसंगी तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना झाली. यावेळी सुमारे पाच हजारांवर स्त्री-पुरूषांची उपस्थिती होती. ३० नोव्हेंबर १९४५ ते २ डिसेंबर १९४५ पर्यंत महाराजांचा मुक्काम लाखांदुरात होता. ८ एप्रिल १९४८ ला लाखांदूर येथील पाच दिवसांच्या जिल्हासंमेलनाच्या कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती.
पवनी तालुक्यातील आमगांव
पवनी तालुक्यातील आमगांव (आदर्श) येथील सर्वांगीण शिक्षण वर्गाच्या निमित्ताने महाराज येथे उपस्थित होते. त्यानंतर येथे सेवाश्रम स्थापन केले. यासाठी रूक्मिणीबाई गोस्वामी यांनी ४५ एकर जमीन व घर दान केले होते. येथे सामुदायिक पद्धतीने पडीत जमिनीचा कायापालट केला. आंबाडा येथे महात्मा फुले वाचनालयाचे उद्घाटन केले. २४ ते ३० जानेवारी १९५३ मध्ये आदर्श आमगांव येथे महात्मा गांधी स्मृतिसप्ताह उत्साहात पार पडला. यातून आमगावाची आदर्श ओळख निर्माण झाली.
तुमसर येथे चातुर्मास
१९५३ चा चातुर्मास वर्ग तुमसरला झाला. या वर्गात विदर्भ, मध्यप्रदेश, मध्यभारत, मुंबई आदी प्रदेशातून निवडक सेवाधिकारी व सेवक उपस्थित होते. या वर्गाला संत गाडगे महाराज, दादा धर्माधिकारी, आप्पाजी गांधी आदी मान्यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते. याच वर्गाच्या काळात महाराजांनी श्री ग्रामगीतेचे पहिले १३ अध्याय लिहिले. यावेळी तुमसरच्या प्रत्येक वॉर्डात सेवा समित्या स्थापन करून दुर्गंधी येत असलेला भाग स्वच्छ केला. २३ आॅक्टोंबर १९५३ ला चातुर्मास्य वर्गाचा समारोप झाला. याला तुमसरचे सेठ दुर्गाप्रसाद सराफ यांनी खूप मदत केली.
भंडारा येथे चातुर्मास
१९५४ चा चातुर्मास वर्ग भंडारा येथे पार पडला. राजे गणपतराव पांडे व बुटी यांच्या वाड्यात कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था होती. भंडारा येथील शेंदूर्णीकर, सेठ नटवरलाल, राजारामजी निर्वाण, हर्देनिया, परसोडकर, रंभाड आदींनी या वर्गाला मदत करून ते यशस्वी केले.
७ आॅक्टोंबर १९५४ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर सीतारामदासजी महाराज, पाचलेगांवकर महाराज व दामोदर महाराजांच्या उपस्थितीत भव्य रामधून व शिस्तबध्द मिरवणूक निघाली. ८ आॅक्टोबर १९५४ ला भंडारा जिल्हा समाजसेवा परिषदेचे उद्घाटन चिंचबनात झाले. महाराजांच्या प्रवचनानंतर राज्यपाल डॉ. पट्टाभिसितारामैय्या यांचे प्रभावी भाषण झाले. भंडारा नगरात त्या दिवशी १० ठिकाणी सायंकाळी प्रार्थना झाल्या. २३ ते ३० नोव्हेंबर १९५४ पर्यंत भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूदानाकरिता दौरा व अनेक कार्यक्रम महाराजांनी संपन्न केले.
३० एप्रिल १९६० ला वंदनीय तुकडोजी महाराजांचा ५१ वा वाढदिवस भंडारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात करण्याचे राजारामजी निर्वाण यांनी ठरविले. मात्र, राष्ट्रसंतांना ते मान्य नव्हते.
त्यांनी माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गावाचा वाढदिवस साजरा करा असे सांगितले. त्यानुसार राष्ट्रसंतांचा वाढदिवस ‘ग्रामजयंती’ उत्सवाच्या रूपाने साजरा करण्याचे ठरविले. यासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून गोंदियाचे प्रसिध्द उद्योगपती मनोहरभाई पटेल हे होते. त्यांच्या नेतृत्वात गोंदिया येथून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप भंडारा येथील शहीद मैदानावर अतिभव्य प्रमाणात झाला. यावेळी राष्ट्रसंतांसोबत राज्यपाल श्रीप्रकाश उपस्थित होते. तेव्हापासून ग्रामजयंती साजरी केली जाते.
२२ मे १९६८ ला वैनगंगा नदीच्या काठावर वैनगंगा सभागृहाचे उद्घाटन व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा वंदनीय महाराजांच्या हस्ते करण्यात आली.

निर्वाण कुटुंबीयांनी केली सेवा
अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाची स्थापना केल्यानंतर १९४६ मध्ये अण्णाजी महाराज यांचे गाव कान्हाळगांव येथे राष्ट्रसंत कीर्तनाला आले होते. यावेळी राजारामजी (दादाजी) निर्वाण यांची भेट झाली. ते महाराजांच्या विचारांनी प्रभावित झाले. राजारामजी हे त्यावेळी भांड्याच्या दुकानात नोकरी करीत होते. महाराजांनी त्यांना स्व:ताचा व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर दादाजींनी छोटेशे दुकान सुरू केले. अथक परिश्रमाचे फलित म्हणून व्यवसायात त्यांना यश आले. राष्ट्रसंतांचे आशीर्वाद व परिश्रम यामुळे छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर निर्वाण मेटल वर्क्स या पितळी भांड्यांच्या कारखान्यामध्ये झाले. या कारखान्याचे उद्घाटन राष्ट्रसंत महाराजांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसंत यांचे भंडारा शहरात आगमन झाल्यानंतर ते नेहमी दादांकडेच मुक्कामाला असायचे.१९५४ च्या चातुर्मासाची धुरा दादांवर सोपविली होती. यामुळे दादांचे महाराजांशी संबंध अधिक दृढ झाले. दरम्यानच्या काळात दादांचे राहते घर कोसळले. या संकटाच्या घडीला राष्ट्रसंतांच्या शेकडो सेवकांनी श्रमदानातून घराची पुनर्बांधणी करून दिली. दादांची पत्नी सरस्वताबार्इंनी यांनी खांद्याला खांदा लावून मदत केली.

Web Title: Rashtrasants' Bhandara Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.