पावसाचा दगा, भातशेती आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:01 IST2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:01:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोनाचा प्रादूर्भाव आणि पावसाची दडी अशा दुहेरी संकटात भात उत्पादक शेतकरी सापडले आहे. गत ...

Rains betrayed, paddy cultivation was in danger | पावसाचा दगा, भातशेती आली धोक्यात

पावसाचा दगा, भातशेती आली धोक्यात

ठळक मुद्देदहा दिवसापासून पावसाचा थेंब नाही : पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, रोवणी झालेल्या शेतात पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा प्रादूर्भाव आणि पावसाची दडी अशा दुहेरी संकटात भात उत्पादक शेतकरी सापडले आहे. गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा एकही थेंब न पडल्याने रोवणी उलटण्यची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात भात रोवणीचे क्षेत्र एक लाख ६१ हजार ४९३.७५ हेक्टर असून आतापर्यंत ८९ हजार ८३७ हेक्टरवर म्हणजे ५७ टक्के रोवणी झाली आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पºहे आणि रोवणी झालेले भातपीक वाचविण्याची धडपड शेतशिवारात सुरू आहे.
भंडारा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. सुरूवातीला हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला. शेतकरी उत्साहाने मशागतीच्या कामाला लागले. मात्र त्याच काळात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू लागला. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. शेतकरी चिंतेत सापडले. मात्र परिस्थितीशी दोन हात करणारा शेतकरी हार मानणारा नाही. मोठ्या जिद्दीने धानाच्या नर्सरी आपल्या शेतात टाकल्या.
मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी लॉकडाऊनच्या संकटातही समाधानी दिसत होता. परंतु आता गत दहा दिवसांपासून पावसाने सर्वदूर दडी मारली आहे. शेतशिवार उदास दिसत आहे. शेतकरी पऱ्हे आणि रोवणी झालेले पीक वाचविण्याची धडपड करीत आहे. १५ दिवसापुर्वी शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग आता कमी दिसत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट आहे. गावागावात कोरोनासोबत केवळ पावसाचाच विषय असतो.
लाखांदूर तालुक्यावर वरूण राजा रूसला असून धान शेतीला भेगा पडून रोवणीचे क्षेत्र नष्ट होण्याची भीती निर्माण होत आहे. तालुक्यात यंदा जवळपास ८२० हेक्टर कोरडवाहू क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली तर काही भागात रोवणी करण्यात आली. चौरास भागातील काही कोरडवाहू शेतकºयांनी गोसे धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी घेतले तर काहींनी मोटरपंपाच्या सहायाने सिंचन केले. परंतु आता भुगर्भातील जलसाठाही कमी होत आहे. कालव्याचे पाणीही पुरेसे मिळत नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
लाखनी तालुक्यात ६८ टक्के धान रोवणी आटोपली आहे. पावसाच्या अभावाने शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. तालुक्यातील लाखनी, पिंपळगाव, पोहरा, मुरमाडी, पालांदूर, महसूल मंडळामध्ये पावसाअभावी सुमारे ३२ टक्के रोवणी रखडली आहे. तालुक्यातील तलाव, बोड्या आणि नाल्यांमध्येही पाणी साचले नाही. विंधन विहिरीच्या मदतीने सिंचन केले जात आहे. पालांदूर परिसरात पावसाने दीर्घ रजा घेतल्याने रोवणी वाळत आहे. नव्याची रोवणी मरणासन्न अवस्थेत आहे. निरूपयाने शेतकरी मिळेल तिथून पाणी घेवून काही ठिकाणी रोवणी करीत आहे. तापमानात कमालीची वाढ झाल्याने चिंतेत भर पडत आहे. सध्या तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.
साकोली तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. दररोज कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. रोवणी झालेल्या शेतात शेतकरी मोटरपंप लावून ओलीत करताना दिसत आहे. परंतु पुरेशा पाण्याअभावी संपूर्ण क्षेत्र सिंचित करणे कठीण जात आहे. त्यातच वीज भारनियमनाचाही फटका बसत आहे. तालुक्यात आठ तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
पवनी तालुक्यातही अशीच अवस्था असून अड्याळ परिसरात शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. शेतकरी मोठ्या आशेने आकाशाकडे नजरा लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहे. नेरला उपसासिंचन योजनेवर शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. परंतु आता तेही पाणी अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. भुयार परिसरात शेतकरी आणि शेतमजुरांची घालमेल वाढली आहे. जवळचा पैसा शेतीत लावला असून पाऊस बरसला नाही तर संपूर्ण पैसा पाण्यात जाण्याची भीती आहे. भुयार येथील शेतकरी खटू खुळसिंगे म्हणाले, थोड्या फार पावसाने चार ते पाच बांधात रोवणी झाली. परंतु आता पावसाअभावी तिही वाळण्याच्या मार्गावर आहे. उर्वरित पºहे वाचविण्यासाठी घागरीने पाणी द्यावे लागत असल्याचे सांगितले.
मोहाडी तालुक्यात पावसाने हुलगावनी दिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले आहेत. जांब लोहारा परिसरातील शेतकरी पावसाची आस लावून बसला आहे. अनेक भागातील रोवणी खोळंबली आहे. त्यात लोहारा, जांब, सोरणा, लंजेरा, देऊळगाव, ताळगाव, धोप, गायमुख, सोनपुरी या परिसरात रोवणीची कामे ठप्प आहेत.
मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात सिंचनाची सोय असलेल्या केवळ २५ टक्के क्षेत्रात रोवणी झाली असून ७५ टक्के शेत रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. कडक उन्हामुळे जलपातळी खालावली असून शेतातील पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. तुमसर तालुक्यातही अशीच अवस्था असून दररोज शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसल्या आहेत.
भंडारा तालुक्यात पावसाअभावी रोवणी खोळंबली असून जवाहरनगर परिसरातील साहुली, पिपरी, चिंचोली, कोंढी, सावरी, परसोडी, ठाणा, शहापूर परिसरात शेतकरी चिंतेत दिसत आहे. पावसाने हजेरी लावली नाही तर संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घटली
भात पिकासाठी मुबलक पावसाची आवश्यकता असते. सुरूवातीला दमदार पाऊस बरसला. मात्र आता गत दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घटली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ जुलै दरम्यान ६३८.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा या कालावधीत ४९५.३ मिमी पाऊस कोसळला. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ५७८.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसाने दडी मारली असून गत दहा दिवसात तर पाऊस निरंक आहे. हवामान खात्याने सुरूवातीला समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु गत दहा दिवसांपासून कडक उन्ह तापत असून पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. हवामान खात्याने मात्र १ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

तलावात अल्पसाठा लहान बोड्यात ठणठणाट
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गावागावात तलाव आणि बोड्या आहेत. दरवर्षी सुरूवातीलाच पडणाºया पावसात तलाव आणि बोड्या तुडूंब भरतात. परंतु यावर्षी जिल्ह्यातील तलावांमध्ये अल्प साठा आहे. लहान बोड्यात तर पाण्याचा ठणठणाट आहे. नाले व बंधारेही कोरडे पडले आहेत.
यंदा उडीद आणि मूगाकडे शेतकºयांची पाठ
भात उत्पादक भंडारा जिल्ह्यात मूग आणि उडीदाचे पीक घेतले जाते. यावर्षी १३४ हेक्टरवर मूग आणि ६५ हेक्टरव उडीत लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील उडीत आणि मूगाचे क्षेत्र यंदा निरंक आहे.
१३ हजार हेक्टरवर नर्सरी तर २६४१ हेक्टरवर आवत्या
धान पिकासाठी पऱ्हे टाकावे लागतात. यंदा १३ हजार १६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्ह्यांची नर्सरी लावली होती. सुरूवातीला आलेल्या पावसाने पऱ्ह्यांची वाढ झाली. मात्र आता रोवणी रखडल्याने नर्सरीतच पऱ्हे पिवळे पडत आहे. पऱ्हे जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. पऱ्हे नष्ट झाले तर शेत पडीक ठेवण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी जिल्ह्यात २६४१.८० हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानाची रोवणी झाली आहे.

Web Title: Rains betrayed, paddy cultivation was in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.