पाण्यासाठी भाकपचे उपोषण
By Admin | Updated: February 16, 2016 00:42 IST2016-02-16T00:42:28+5:302016-02-16T00:42:28+5:30
शहरात दुषित पाणी पुरवठा व मुबलक पाणी पुरवठा या मागणीला घेऊन आज भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले.

पाण्यासाठी भाकपचे उपोषण
समस्या सुटता सुटेना : आश्वासनानंतर आंदोलन मागे
भंडारा : शहरात दुषित पाणी पुरवठा व मुबलक पाणी पुरवठा या मागणीला घेऊन आज भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
भंडारा शहरातील बहुसंख्य नागरिकांना नगरपरिषदेमार्फत दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच काही ठिकाणी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराची लोकसंख्या व वाढते स्वरुप पाहता नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा संदर्भात नवीन यंत्रणा पुन:स्थापित केली नाही. आधीच नियोजनाचा अभाव त्यात नाग नदीच्या पाण्याचा शिरकाव वैनगंगेच्या नदीपात्रात होत असल्याने समस्येत अजून भर पडली आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाने सुजल निर्मल योजनेचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे नव्या योजनेच्या प्रारुपात पाठवायला हवे होते. मात्र ते मंजुरीसाठी गोंदिया कार्यालयात धुळखात आहे. परिणामी भंडारावासीयांना नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ केव्हा मिळेल यात शंका व्यक्त केली जात आहे.
प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाण्याचा उपयोग झाल्यास शहरात भूमिगत गटार योजना होऊ शकते. तसेच डासमुक्त व घाणमुक्त शहर निर्माण होऊन दुषित पाण्यापासूनही शहरवासीयांची सुटका होईल यात शंका नाही. मात्र पालिका प्रशासनाच्या अनियोजनामुळे ही समस्या सुटलेली नाही. दूषित पाण्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, पाणीपुरवठा योजनेचे नवीनीकरण करण्यात यावे, पंपींग स्टेशन, जलशुद्धीकरण संयंत्र नवीन लावण्यात यावे, चार नवीन जलकुंभ बांधण्यात यावे, आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन वसाहतीत जलवाहिनी घालण्यात यावी, प्रतिव्यक्ती पिण्याचे ७० लिटर शुद्ध पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी, वैनगंगा नदीतील दूषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास त्रिमूर्ती चौकात भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु करण्यात आले. दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या संदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्याने सदर आंदोलन मागे घेत असल्याचे हिवराज उके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आंदोलनात वामनराव चांदेवार, रामकृष्ण जगदेवे, हरिदास जांगळे, सदानंद इलमे, माणिकराव कुकडकर, झुलन नंदागवळी, सायत्रा सहारे, पुष्पा तिघरे, शांता कनोजे, शशीकला मालोदे, आशा गजभिये यांच्यासह अनेक महिला पुरुष उपस्थित होते. (प्रतिनिधी)