जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:25+5:30
रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली.

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भात मान्सून सक्रिर्य झाल्यानंतर सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. भंडारा शहरातही जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले होते. तर मोहाडी तालुक्यातील घोरपड येथे वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला.
रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली. मात्र सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर सारखा पाऊस कोसळत होता.
भंडारा शहरात तासभर झालेल्या या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याचे दृष्य दिसत होते. या पावसाने जनजीवन प्रभावित झाले होते. शहरात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. मोहाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार घोरपड येथील शेतकरी दिलीप नागोराव पुडके वीज कोसळून ठार झाले. ते आपल्या शेतात पºहाटी लावण्याचे काम करीत होते.
पवनी येथे दुपारी २.४५ वाजतापासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोंढा परिसरात ३.५० वाजतापासून पावसाचा सरी सुरु झाल्या. लाखनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून पालांदूर परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.
तुमसर शहरासह तालुक्यातील पवनारा, खापा, मोहाडी तालुक्यातील जांब लोहारा, करडी पालोरा, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, लाखनी यासह साकोली शहरासह एकोडी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
पऱ्हे भरणीला येणार वेग
धान पिकासाठी सुरुवातीला पर्ह्यासाठी नर्सरी टाकावी लागते. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली आहे. मात्र दमदार पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये असे कृषी विभागाने सुचविले होते. मात्र ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पºहे भरणीला सुरुवात केली होती. मात्र आता दमदार पाऊस झाल्याने पºहे भरणीला वेग येणार आहे.
दोन दिवसात झालेल्या पऱ्हेटाकणीला सोमवारच्या पावसाने फायदा होणार आहे. पऱ्हे टाकणे निश्चितच साधणार आहे. अनेक शेतकरी आता जोमाने कामाला लागणार आहे. जिल्ह्यातील एक ९४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून शेतकरी धान बियाण्यांची चाचपणी करीत आहे. कोरोना संकटामुळे शेतकरी धास्तावला असून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवित आहे.