अवघ्या महिनाभरात उखडला डांबरी रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:07+5:30
रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत असतानाच दुसरीकडे अल्पावधीत रस्त्याचे बेहाल होत आहेत.

अवघ्या महिनाभरात उखडला डांबरी रस्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करचखेडा ते खमारी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडाराचे वतीने महिनाभरापूर्वी डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बीबीएमचे काम अंतिम टप्प्यात आले असताना निकृष्ट बांधकामामुळे बीबीएम पूर्णत: उखडून रस्त्यावर गिट्टीचा पसारा पडला आहे. वाहन चालकांचा जीव संकटात सापडला आहे.
रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत.
भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत असतानाच दुसरीकडे अल्पावधीत रस्त्याचे बेहाल होत आहेत.
शासनाने कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणावर खर्च होत असताना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही का टिकाव धरत नाही, हा चौकशीचा विषय आहे.
भंडारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने महिनाभरापूर्वी करचखेडा ते खमारी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले.
करचखेडा ते बेरोडी पर्यंतच्या भागात बीबीएम करण्यात आले. परंतु कारपेट झालेले नाही. रस्ता अनेक ठिकाणाहून खड्ड्यांनी बरबटलेला आहे. त्यानंतर सुरेवाडा ते खमारी दरम्यान बीबीएमचे काम सुरु करण्यात आले. एकेरी बीबीएम पूर्ण झाले असतानाच बीबीएममधील खडी उखडून रस्त्यावर पसरलेली आहे. जुना रस्ता वाहतुकदारांना दिसत आहे.
रस्त्यावरील बीबीएम पूर्णत: उखडला असून निकृष्ट बांधकामाचे पाप लपविण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत.
‘अंधेर नगरी, चौपट राजा’सारखी परिस्थिती या मार्गावर दिसून येत असल्याने वाहतुकदारांमध्ये कमालीचा असंतोष आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्यामुळे बीबीएम मातीत दाबल्या गेले
पावसाळ्यापूर्वी बेलगाव ते खमारी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. बीबीएम झाले असताना काम थांबविण्यात आले. पावसाळ्यात बीबीएम झालेल्या रस्त्याची वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघात बळावले होते. बीबीएम अनेक ठिकाणी मातीत दाबल्या गेला. पावसाळ्यानंतर खड्ड्यांची नावापुरती डागडुजी करण्यात आली. परंतु या रस्त्यावर अजूनही वाहन चालविताना कसरत करावी लागते. कारपेट अजूनही झालेले नाही.
गैरप्रकाराला अधिकाऱ्यांचे पाठबळ
वर्षभरापूर्वी खडकी ते ढिवरवाडा रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. परंतु बांधकामाच्या महिनाभरापासून रस्त्याला खड्डे पडणे सुरु झाले. जुना रस्ता डोके वर काढून डोकावू लागला. खड्ड्यांची संख्या वाढून आज रस्त्याचे बेहाल झाले आहे. बांधकामाचा फटका या रस्त्यावरील सर्व नागरिकांना भोगावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा चौकशीची मागणी केली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडस न करता पाठबळ दिल्याचे दिसून आले.