संघटनेमुळे समस्या सुटतात!
By Admin | Updated: January 10, 2017 00:41 IST2017-01-10T00:41:33+5:302017-01-10T00:41:33+5:30
कोणत्याही समस्या या मानव निर्मित आहेत. त्या समस्यांचे निराकरण करणे हे माणसाच्या हाती आहे.

संघटनेमुळे समस्या सुटतात!
राहुल डोंगरे यांचे प्रतिपादन : कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा कामगार मेळावा
तुमसर : कोणत्याही समस्या या मानव निर्मित आहेत. त्या समस्यांचे निराकरण करणे हे माणसाच्या हाती आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या हे शासन दरबारी मांडता येतात व कर्मचाऱ्यांवर अन्याय जर झाला असेल तर त्याची दखल संघटना घेत असते. संघटना मजबुत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळ, पैसा व बुध्दी संघटनेला द्यायलाच पाहिजे. त्यातुनच कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार व संघटनेमुळेच समस्या सुटतील, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे भंडारा जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांनी केले.
कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना भंडारा विभागाच्या विभागीय कामगार मेळावा सिंधी धर्मशाळा, तुमसर येथे घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष अशोक डुले होते. प्रमुख अतिथी म्हणून धम्मपाल ताकसांडे, विजय नंदागवळी, उदय मालाधारी, विधी सल्लागार, केंद्रीय कार्यकारिणी प्रशांत भोयर, विभागीय सचिव दिपक मेश्राम, विभागीय कोषाध्यक्ष उपस्थित होते अतिथींनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्यावर चर्चा करुन समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, या संबंधाने मार्गदर्शन केले. राज्य परिवहन महामंडळाची सद्यास्थिती, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची स्थिती, राज्य परिवहन नियमाबाबतची माहिती, तसेच सातव्या वेतन आयोगासंबंधाने मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना सतत आपल्या पाठीशी राहील याची ग्वाही दिली. कामगार मेळाव्यात गोंदिया, तुमसर, पवनी, साकोली, भंडारा आगाराचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी तसेच विभागीय कार्यशाळा व विभागीय कार्यालय भंडाराचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी तसेच सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
संचालन विभागीय कोषाध्यक्ष दिपक मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन ललीत सोनवाने यांनी केले. कार्यक्रमासाठी लतीश नारनवरे, दिगांबर डोंगरे, दिनेश सरोदे, चिंतामण बागडे, तेजराम राऊत यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)