४० चौरस मीटर जागेसाठी अकृषक परवानगीची आवश्यकता नाही
By Admin | Updated: June 22, 2014 23:55 IST2014-06-22T23:55:04+5:302014-06-22T23:55:04+5:30
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२ (२) मधील नवीन सुधारणानुसार ग्रामीण भागात शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचे जे ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नाही

४० चौरस मीटर जागेसाठी अकृषक परवानगीची आवश्यकता नाही
भंडारा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२ (२) मधील नवीन सुधारणानुसार ग्रामीण भागात शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचे जे ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नाही ते वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनात रूपांतर करण्यासाठी अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही. तसेच अशा जागेमध्ये लघु वाणिज्यक उपक्रमांसाठी सुद्धा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. यासाठी कलम ११७ (५ अ) नुसार अकृषिक आकारणी लागू नाही.
या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अनागरी भागातील वैयक्तिक निवासी वापराखालील इमारतीमधील वाणिज्य वापरास अकृषिक परवानगी घेण्यामधून सूट याबाबत १३ सप्टेंबर २०१२ रोजी शासन निर्णय जाहीर केलेले आहे.
त्या अन्वये नगरेतर क्षेत्रातील कोणत्याही शेतजमिनीचा वापर वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनासाठी करता येईल. नगरेतर क्षेत्रात वैयक्तिक खऱ्याखुऱ्या वापराखालील असलेल्या अशा जागामध्ये ४० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ नसलेल्या जागेत सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम राबविता येतील. यामध्ये छोटे दुकान, पिठाची गिरणी, किराणा दुकान, कांडप मशीन या सारख्या सुक्ष्म उपक्रमांकरिता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
परंतु सुक्ष्म उपक्रमाकरिता आणि अशा लघु वाणिज्यक प्रयोजनाकरिता जागांचा वापर करणारी व ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नसलेले क्षेत्र अशा उद्देशासाठी व्यापरणारी व्यक्ती, ज्या दिनांकास जमिनीच्या वापरात अशा बदल करीत त्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, विहीत करण्यात येईल, अशी नमुन्यात ग्राम अधिकाऱ्यामार्फत तहसीलदाराला असा बदल केल्याच्या दिनांकाची सूचना देईल. तसेच इतर माहिती सादर करील आणि त्याची एक प्रत जिल्हाधिकाऱ्याला देखील अग्रेषित करील.
अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)