ना कारवाई, ना दंड
By Admin | Updated: October 29, 2015 01:06 IST2015-10-29T01:06:40+5:302015-10-29T01:06:40+5:30
‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

ना कारवाई, ना दंड
आरोग्य धोक्यात : उघड्यावर शौच सुरूच, आधुनिक तांत्रिक माध्यमाची सुरूवात कधी?
भंडारा : ‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ‘गुड मॉर्निंग दल’ स्थापन करून त्यांची गस्त घालण्याचे आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परंतु, या अभियानाला अनेक महिने लोटले तरी कुठेही कोणती कारवाई झालेली नाही, ना कुणालाही दंड झाला नाही. त्यामुळे हे अभियान प्रसिद्धीचा स्टंट झाला आहे.
उघड्यावर शौच केल्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळेच स्वच्छतेचे महत्व ओळखून सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत उघड्यावर शौच करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई होणार आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. गृहविभागाने पोलीस यंत्रणेचे सहकार्य घेण्यासाठी १२ आॅगस्ट २००८ च्या परिपत्रकाचा उपयोग करून मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत फौजदारी कारवाईचे निर्देशही दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन केले जाते. यात गावातील गणमान्य व्यक्तीचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र अशी गस्त कुठेही दिसत नाही. ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. जिल्हास्तरावर स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटस्अॅपसारखे अॅप तयार करून स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती आधुनिक तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
स्वच्छताविषयक जनजागृतीकडे दुर्लक्ष
स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र जनजागृतीकडे दुर्लक्ष करून ग्रामीण भागात उघड्यावर शौच केले जात आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा रस्त्यावर चालणेसुद्धा कठिण होऊन जाते. अशाप्रकारे घाण पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामसेवकांनी विनंती केल्यावर पोलिसांकडून कारवाईसाठी सहकार्य केले जाते.
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे
भंडारा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येतात. त्यावर मोकाट जनावरे चरतात. पॉलिथीन बॅगमध्ये लोक काही खाण्याच्या वस्तू, शिळे अन्न कचऱ्यात फेकतात. मोकाट जनावरे ते पदार्थ खाताना सोबत पॉलिथीन बॅगही खाऊन टाकतात. त्यामुळे त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जमून काही दिवसांनी त्यांचे पोट फुगते. त्यातूनच जनावरांवर जीव गमवावा लागतो. पण त्याबाबत पालिका प्रशासन काहीही कार्यवाही करीत नाही.