निमगावच्या शाळेने घेतली गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:28+5:30
१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत बँक, विविध वस्तु भांडार, सैनिकी पथसंचलन, विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग आदी उपक्रमात सहभागी आहेत.

निमगावच्या शाळेने घेतली गगनभरारी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा असल्यातरी बहुतांश शाळांनी आधुनिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी कंबर कसली आहे. असाच प्रयोग लाखनी तालुक्यातील निमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने राबविला आहे. मुख्याध्यापिका मीरा कहालकर यांच्यासह शिक्षकांच्या प्रयत्नांनी या शाळेने विविध उपक्रम राबवून गगनभरारी घेतली आहे.
१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत बँक, विविध वस्तु भांडार, सैनिकी पथसंचलन, विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग आदी उपक्रमात सहभागी आहेत.
माती व कवेलूच्या रुपात सुरु झालेल्या या शाळेची आज अवस्था सुस्थितीत आहे. मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या पुढाकाराने शाळेला देखणे स्वरुप आले आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमासह राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे शिक्षण विभागानेही याचे कौतुक केले आहे. यापुर्वी मुख्याध्यापक असलेले डमदेव कहालकर यांनी यासाठी मौलाचे सहकार्य केले आहे.
यासाठी सरपंच रुपचंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख, विजय डाभरे, गरपडे, कमाने, अल्का वंजारी आदींचेही विशेष सहकार्य लाभत आहे.
निसर्गरम्य परिसर
जवळपास दोन दशकांपूर्वी या गावाचा अन्य गावांशी थेट संबंध नव्हता. रस्ताही नसलेल्या या गावात शाळेने गगन भरारी घ्यावी ही उल्लेखनीय बाब ठरली आहे. मुख्याध्यापिका मीरा कहालकर व अन्य शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळेच्या निसर्गरम्य परिसराला देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे. लाखनीसह अन्य गावांशी संपर्क आल्याने शाळेच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला आहे. विद्यार्थीही या निसर्गरम्य परिसरात रममान होऊन विद्यार्जन करीत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षीत आहे. तरच सक्षम समाज निर्मिती होईल यात दुमत नाही. आजची पिढी स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
-मीरा डमदेव कहालकर, मुख्याध्यापक
आमच्या गावातील ही शाळा अन्य गावांसमोर एक दिवशी आदर्श ठरेल, असा आमचा विश्वास आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य अत्यंत महत्वाची बाब ठरत आहे.
-रुपचंद चौधरी, सरपंच तथा पालक
सैनिकी पथसंचलन
कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी सैनिकी पथसंचलन करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत असतात. याशिवाय कवायत व प्रात्याक्षिकातून सुप्त गुणांचे प्रदर्शनही विद्यार्थी करीत आहेत.