एक एकरातील मिरची पिकात एक लाखांचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:39+5:30
भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते. त्यातच पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्धार केला.
मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. कितीही मेहनत घेतली तरी हाती काहीच उरत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव. मात्र या सर्वांना फाटा देत मेहनतीच्या जोरावर पालांदुरच्या एका शेतकऱ्याने एक एकर मिरची पिकातून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमाविला. त्यामुळेच अरुण पडोळे आता पालांदूर परिसरातील शेतकºयांसाठी आदर्श ठरले आहेत. दररोज त्यांच्या शेतावर मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांची गर्दी असते.
भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते. त्यातच पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्धार केला. मेहनत घेत त्यांनी मिरचीची लागवड केली. मजूर समस्येला तिलांजली देत हाती कुदळ, फावडे घेत शेती कसली. हवामानातील बदल, पाण्याची टंचाई आदींचा अभ्यास करून त्यांनी मिरचीची लागवड केली. १५ आॅगस्टला रोप टाकून सप्टेंबर महिन्यात मिरचीची लागवड केली. डिसेंबरमध्ये पहिला तोडा हाती आला. भंडाराच्या बीटीबीमध्ये त्यांना योग्य भाव मिळाला. अवघ्या एक एकरात त्यांनी चार तोड्यातून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. आणखी तीन चार तोडे शक्य असल्याचे अरुण पडोळे यांनी सांगितले. चुलबंद खोऱ्यात मिरचीची शेती करणारा अरुण पडोळे हा शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरला आहे.
पालांदूर परिसरातील मिरची उत्तम दर्जाची म्हणून प्रसिद्ध आहे. त्या मिरचीला बाजारात इतरांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो. एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी.
-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा