संतांच्या आशीर्वादात घरीच ध्यानसाधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:34+5:30
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात.

संतांच्या आशीर्वादात घरीच ध्यानसाधना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्रोध, मान, माया, लोभ यापासून स्वत:ला परावृत्त करीत क्षमागुण अंगिकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व होय. या पर्वाला जैन धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. गत तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहात जिल्ह्यातील जैन धर्मीय विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करीत आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळामुळे संतांचे आशीर्वाद प्राप्त करीत घरीच ध्यान, साधना व प्रार्थना पूर्ण करीत आहेत.
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात. यासाठी जैन मुनींचे व संतांनी दिलेल्या वचनांचे पालन केले जाते. पर्युषण पर्वात उपवास, नवकारसी, पतीकमन, प्रार्थना याला विशेष महत्व आहे. जिल्ह्यात श्वेतांबर पंथीय असलेल्या कुटुंबियांची संख्या ४० च्या जवळपास आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यात पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे.
भंडारात दोन संताचे आगमन
भंडारा शहरात पर्युषण पर्वानिमित्त दोन संतांचे आगमन झाले आहे. यात संत अक्षय मुनी व दिनेश मुनी यांच्या समावेश आहे. या सप्ताहात त्यांनी दिलेल्या उपदेशांचेही पालन जैन धर्मीय करीत आहेत. यात सायंकाळी ६ वाजतानंतर कुणीही जेवण करीत नाही. सकाळ सत्रात पूजा, मांगलीक पाठ, ध्यान, साधना केली जात आहे. याशिवाय सायंकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीत ध्यान केले जाते. यात मौन धारण करून भगवान महावीरांचे स्मरण केले जाते. आठ दिवसात ज्यांना जसे शक्य होईल ती व्यक्ती निरंकार उपवास करीत असते. सध्या या संतांचे रामदासी मठात वास्तव्य असून पर्युषण पर्वाच्या समाप्तीनिमित्त ते अनुयायांना विशेष मार्गदर्शनही करणार आहे.
पर्युषण पर्व हे जैन धर्मियांसाठी अलौकीक पर्वणी आहे. यात प्रत्येक समाज बांधव भगवान महावीरांनी दिलेल्या उपदेशांचे पालन करून जीवनयापन करण्याचा प्रयत्न करीत असतो. २२ आॅगस्ट रोजी या पर्वाची समाप्ती होणार आहे.
- रमेशकुमार जैन, भंडारा.