यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला
By Admin | Updated: May 11, 2015 00:18 IST2015-05-11T00:18:39+5:302015-05-11T00:18:39+5:30
अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी ....

यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला
शेतीचे उत्पादन घटल्याने परिस्थिती : परंपरागत व्यवसायावर अवकळा
भंडारा : अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी निगडित व्यवसायांवरही पडला आहे. शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
यंदाच्या अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हातचा गेला. रबी हंगामातही अवकाळी पाऊस आणि तुरळक गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे शेतीसह पूरक व जोड उद्योगधंदे ऱ्हासाच्या मार्गावर आहेत. शेती निगडित अवजारे तयार करणाऱ्या लोहार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. भात्यासमोर तासन्तास बसून ऐरणीच्या देवाला स्मरत अवजारे घडवून लोहारा समाज पोटासाठी चार घास गोळा करतो.
गावोगाव परिभ्रमण करत पाल ठोकून निवारा मांडणारे लोहार बांधव शेतकऱ्यांसाठी विळा, कोयते, कुऱ्हाडी, वखर व डवऱ्याची पास, कोळपी, कुदळ आदी अवजारे निर्मिती व दुरुस्ती करून उदरनिर्वाह चालवित असतात. एका गावातील कामे संपली की दुसऱ्या गावात अशी मजल दरमजल करीत ही कुटुंबे रोजगाराच्या मागे फिरत जातात. भंडारा तालुक्यात या समाजाची ५-१० कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे अनेक वषार्पासून भंडारा येथील घटक बनली आहेत. परिसरातल्या शेतकऱ्यांची अवजारे तयार करून किंवा दुरुस्त्या करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु यावर्षी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या अवजाराची कामे बंद आहेत. ऐन पेरणीच्या कालावधीत फार थोडी चिल्लर कामेच आता शेतकरीवर्ग करतील, असे निराशाजनक मत त्यांनी व्यक्त केले.
बैलगाड्यांची लाकडी चाकेही आता इतिहास जमा होवून त्यांची जागा लोखंडी चाकांनी घेतली आहे. पूर्वी या लाकडी चाकांवर असलेल्या लोखंडी येटाची दुरुस्तीची कामेही लोहार कुटुंब करीत होते. यांत्रिकी करणामुळे निश्चितच लोहारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. (नगर प्रतिनिधी)