जिल्ह्यात हलका धान मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:41+5:30
गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील धान ओला झाला. कापलेला धानाचा कळपा पावसात भिजून त्याला आता अंकर फुटले आहे.

जिल्ह्यात हलका धान मातीमोल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने हलक्या प्रतीच्या धान मातीमोल झाला असून शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. खचलेला शेतकरी कडपा फेरण्याच्या कामात व्यस्त असून पीक विम्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करीत आहे. या अवकाळी संकटाने जिल्ह्यातील धान उत्पादकांचा संपुर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला असून वर्षभराची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील धान ओला झाला. कापलेला धानाचा कळपा पावसात भिजून त्याला आता अंकर फुटले आहे.
दररोज ढगाळ वातावरण राहत असल्याने पावसाच्या भीतीने शेतकऱ्यानी कापणीस वेग दिला आहे. मळणीच्या कामालाही गती आली आहे. परंतु परतीचा पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. बुधवारी दुपारी साकोली तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गत पंधरा दिवसात झालेल्या पावसात सर्वाधिक नुकसान हलक्या धानाचे झाले आहे. धान काळेकुट्ट झाले असून या धानाला बाजारात कवडीची किंमत मिळणार नाही.
भारी प्रतीचे धान म्हणजे जास्त कालावधीचा धान सध्या निसवण्याच्या अवस्थेत आहे.
परतीचा पाऊस परतण्याचे नाव घेईना!
परतीचा पावसाने शेतकऱ्यांना रडवायचे ठरविलेले दिसते. तो परतीचे नाव घेत नाही. धानाचे प्रचंड नुकसान करणारा हा पाऊस प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असूनही माघारी जात नाही. शेतात सर्वत्र भिजलेले धानाचे कडपे दिसत आहे. दररोज आकाशात ढग पाहून शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. परतीचा पाऊस कधी परतणार असा सवाल शेतकरी करीत आहे.
विमा दाव्यासाठी धावपळ
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या धानाचा विमा मिळावा म्हणून शेतकरी धावपळ करतांना दिसत आहे. विमा काढताना संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही आता दावा दाखल करण्यासाठी पुन्हा तीच कागदपत्रे कंपनीचे प्रतिनिधी मागतांना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान झाले असले तरी विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात यायला तयार नाही. दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांनाच अर्ज करुन विमा दावा सादर करण्याचे आवाहन करीत आहे.
संपूर्ण कुटुंब राबते शेतात
पावसामुळे ओला झालेला कळपा वाळविण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. मजूर मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळी शेतावर कडपा फेरण्याचे काम करताना दिसत आहे. लहान मुलांसह वयोवृध्दही या कामाला हातभार लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. पावसाने सर्वांनाच कामाला लावल्याचे दिसत आहे.