नगरपालिकेची स्वच्छता अभियानाकडे पाठ
By Admin | Updated: April 5, 2015 00:52 IST2015-04-05T00:52:00+5:302015-04-05T00:52:00+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ ग्राम स्वच्छ भारत अभियान’ सुरु केले.

नगरपालिकेची स्वच्छता अभियानाकडे पाठ
लोकप्रतिनिधींची उदासीनता : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ ग्राम स्वच्छ भारत अभियान’ सुरु केले. या अभियानाला गावोगावी साकार करण्याचे प्रयत्न सुरु झाले. यापुर्वीही सरकारने गाव व शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र शहर व ग्रामीण भागाची परिस्थिती सुधारली नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाने पाठ फिरविल्याचे चित्र जागोजागी असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांवरुन लक्षात येते.
येथील पालिका प्रशासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेला प्रतिसाद म्हणून काही दिवस मोहिम राबविली. तशी वर्तमानपत्रातून प्रसिध्दी मिळवून घेतली. त्यानंतर मात्र मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात भंडारा शहराचे सौदर्य हरवून गेले की काय? असे चित्र आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या शहराची ही दुरवस्था शहराच्या सौदर्यात विघ्न ठरत आहे. आज, बुधवारला सदर प्रतिनिधीने शहरातील फेरफटका मारला असता शहरातील अस्वच्छता दिसून आली. शहरातील तकिया वॉर्ड, शुक्रवारी वॉर्ड, आदर्श कॉलोनी, मेंढा परिसर, आंबेडकर वॉर्ड, सामान्य रुग्णालय परिसर, मोठा बाजार, लहान बाजार आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढिगारे दिसून आले.
नेहमी अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात नगर परिषदेने स्वच्छता मोहीम राबवून बऱ्यापैकी साफसफाई केली होती काय, हे पण निश्चितपणे सांगणे कठीण आहे. आज स्वच्छता केली तर दुसऱ्या दिवशी शहरातील रस्त्यांवर कचराच कचरा दिसून येतो. जिल्हाधिकारी चौकापासून ते शास्त्रीनगर चौकापर्यंत आणि महात्मा गांधी चौकापासून तर जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यांवर घाण पसरली आहे. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावर किती कचरा साचलेला आहे याची कल्पनाच येत नाही.
कापडाच्या तसेच विविध वस्तूंच्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची पॅकिंग असणारे साहित्य, प्लास्टिकचे कव्हर, कागदी कव्हर, छोट्या कॅरीबॅग असा कितीतरी प्रकारचा कचरा रस्त्यावर साचलेला दिसत आहे.
विशेष म्हणजे रस्त्यावर नागरिकांनी टाकलेला हा कचरा कमी होता म्हणून की काय प्रत्येक दुकानदाराने दुकानातून निघालेल्या कचऱ्याचा ढिगारा दुकानासमोरच लावून ठेवलेला दिसतो. कधीकधी हा ढीग एका ठिकाणी गोळा केला जातो. रस्त्यावर विखुरलेला कचरा आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढिगारे पाहून शहर कचऱ्यात हरविल्याचा भास होत आहे.
मात्र या कचऱ्याची सवय असणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. किमान आपल्या दुकानासमोर तरी कचरा राहू नये, म्हणून त्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची तसदी घेताना कोणीही दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)
स्वच्छता मोहिमेचा विसर
विशेष म्हणजे शहरातील मुख्य मार्ग, बाजार चौक, पोस्ट आॅफीस चौक, भंडारा बसस्थानक परिसर इतर काही भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असते. कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पडले राहतात.
प्रसिद्धीसाठी मोहीम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावे, यासाठी स्वत:पासून मोहिमेला सुरूवात केली असली तरी या मोहिमेकडे बहुतांश नागरिकांनी पाठ दाखविली आहे. केवळ मोहिमेच्या सुरूवातीला लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी तसेच काही सामाजिक संस्थांनी मोहिमेचा गवगवा करून वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित करून घेतल्या.
आरोग्य धोक्यात
भंडारा शहरात लहान बाजार व मोठा बाजार असे दोन स्थळ आहे. याठिकाणी प्रवेश करताच नाकावर रुमाल घ्यावाच लागतो. निकामी भाजीपाला तेथेच फेकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरते. यासंबधी अनेकदा शहरवासियांनी पालिका प्रशासनाकडे निवेदने दिलीत. मात्र पालिका प्रशासन वेळकाढू धोरणाचा वापर करीत असल्याचे दिसून येते.