नेत्यांनो शहरात मोटारसायकलने फेरफटका मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ‘नेत्यांनो शहरातील रस्त्यांवरून मोटारसायकलने आणि तेही आपल्या कुटुंबाला घेऊन एकदा फेरफटका माराच. तेव्हाच तुम्हाला ...

Leaders tour the city on motorcycles | नेत्यांनो शहरात मोटारसायकलने फेरफटका मारा

नेत्यांनो शहरात मोटारसायकलने फेरफटका मारा

ठळक मुद्देसोशल मीडियावर सवाल : अलीशान चारचाकी वाहनातून खड्डे व चिखलाने माखलेले रस्ते दिसतील तरी कसे?




लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘नेत्यांनो शहरातील रस्त्यांवरून मोटारसायकलने आणि तेही आपल्या कुटुंबाला घेऊन एकदा फेरफटका माराच. तेव्हाच तुम्हाला रस्त्यांचे वास्तव कळेल. अलीशान चारचाकी वाहनातून रस्त्यावरील खड्डे आणि चिखल दिसणार तरी कसा’ असा उद्विग्न सवाल सर्वसामान्य सोशल मीडियातून करीत आहेत. भंडारा शहरातील रस्त्यांचे झालेले हाल पाहता सर्वसामान्यांच्या भावना कुणीच जाणून घेत नाहीत. नेत्यांना काही सोयरसुतक नाही, असेच यातून दिसत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सध्या रस्ते आहेत की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळी दिवसात शहरातील प्रत्येक रस्ता उखडला असून अंतर्गत रस्त्यांचे तर हाल विचारायला नको. कोणत्याही रस्यावरून फेरफटका मारा. खड्ड्यातून गेल्याशिवाय पर्यायच नाही. राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा परिषद चौक ते बहिरंगेश्वर मंदिरापर्यंतच्या मार्गाचा अपवाद वगळला तर शहरातील एकही रस्ता सुस्थितीत दिसत नाही.
नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु पावसाळा आला की या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडतात. त्यातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. सातत्याने खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. विविध माध्यमातून या रस्त्यांचे हाल प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न झाले, परंतु साधी डागडुजीही करण्याचे कुणी मनावर घेतले नाही. त्याच मार्गावरून शहरातील सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
शहरातील बहिरंगेश्वर मंदिर ते लाल बहादूर शास्त्री चौक रस्त्याला रस्ता म्हणावे की नाही अशी अवस्था झाली आहे. गत तीन महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. याच मार्गावरुन अवजड वाहतुकही सुरु असते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यात पाणी साचून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी चौकातील रस्त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. वारंवार डागडुजी करुनही हा रस्ता पावसात उखडतो. त्यावर कायम उपाययोजना होताना दिसत नाही.
हा सर्व प्रकार शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना दिसत नसावा असेच आता म्हणावे लागेल. रस्त्यांची अवस्था पहायची असेल तर नेत्यांनी शहरातील रस्त्यांवर दुचाकीने तेही आपल्या परिवारासह फेरफटका मारून दाखवावा असा सवाल सोशल मीडियातून केला जात आहे. शहरातील रस्त्यांचे नेमके वास्तव अलीशान चारचाकी वाहनातून दिसणार नाही. त्यासाठीच नेत्यांनी एकदा तरी मोटरसायकलने फेरफटका मारून वास्तव अनुभवण्याची गरज आहे.

नवीन वसाहतीत चिखलमय रस्ते

शहरालगत अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. विकसकांनी रस्ते, पाणी, नाल्या आदी सुविधा देण्याचे आमीष दाखवून या परिसरातील घरे ग्राहकांना विकली. मात्र आता अनेक वसाहतीत जाण्यासाठी रस्तेच नाहीत. कच्चे रस्ते पावसाने चिखलमय झाले आहेत. पाऊस गेल्यानंतरही आठ-दहा दिवस या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण होते. अनेकांना तर आपली वाहने दुसºयाच्या घरी ठेवून चिखल तुडवत घर गाठावे लागते.

Web Title: Leaders tour the city on motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.