वनसंवर्धनासाठी सुविधांचा अभाव

By Admin | Updated: January 17, 2015 01:16 IST2015-01-17T01:16:39+5:302015-01-17T01:16:39+5:30

वनविकास महामंडळ, नागझिरा अभयारण्य परिसरात कोट्यावधी रूपयाच्या वनसंपदेची तस्करी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

Lack of facilities for forestry | वनसंवर्धनासाठी सुविधांचा अभाव

वनसंवर्धनासाठी सुविधांचा अभाव

साकोली : वनविकास महामंडळ, नागझिरा अभयारण्य परिसरात कोट्यावधी रूपयाच्या वनसंपदेची तस्करी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र वनांचे संरक्षण करण्यासाठी वनकर्मचारी आणि वनअधिकारी यांच्याकडे पुरेशा सुविधा नसल्यामुळे तस्करांवर आळा घालण्यात त्यांना पुरेसे यश आलेले नाही.
वनविकास महामंडळ व नागझिरा अभयारण्य परिसरातील पिटेझरी, रेंगेपार, घानोड, खांबा, आमगाव व सातलवाडा या परिसरातील गावामध्ये २०० ते २५० हातआऱ्यांनी सागवनाची कटाई केली जाते. या वनतस्करांच्या व्यवसायात परिसरातील ४०० ते ५०० लोक गुंतलेले आहेत. त्यांच्यात कामाची वाटणीही झाली आहे. जंगलात जाऊन सागवनाची लाकडे कापून आणणाऱ्यांच्या टोळ्या आहेत. या परिसरातील वन कम्पार्टमेंटमध्ये जावून लाकडे तोडून खांद्यावर व डोक्यावर वाहून नेणे सुरू आहे.
गावात आल्यानंतर लाकूड कंत्राटदार गोलाई व लांबीनुसार त्या लाकडाचे दर ठरवितात. अवैध कटाई करणारे कंत्राटदार या लाकडाची खरेदी करून मजुरांकडून कामे करुन घेतात. त्यांना २०० ते हजार रूपयापर्यंत कामानुसार मजुरी देण्यात येते. मागणीनुसार लाकडे कापली जातात.
साकोली आणि तालुक्यातील लाकडांची मागणी नागपूर, गोंदिया येथे आहे. खरेदीदार गरजेनुसार संबंधित कंत्राटदाराला अग्रीम देऊन जातात. मागणीनुसार कटाई केल्यानंतर ट्रक, आॅटो, सुमो, व्हॅनने हे लाकूड पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र याची माहिती वनविभागाला कशी कळत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
साकोली परिसरात दोनशेच्यावर हातआरीने लाकूड कटाई करणारे कारागीर आहेत. दररोज या परिसरातून लाखो रूपयांच्या वनसंपदेची तस्करी सुरू आहे. यात सागवन तस्करीचे प्रमाण अधिक आहे.
साकोली परिसरात हा व्यवसाय मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. या व्यवसायात गुंतलेले मजूर पाच सहा तासात पाचशे ते हजार रूपयांची कमाई करतात. वनकर्मचारी जीवाच्या भीतीपोटी व शस्त्राअभावी कारवाई करण्यास धजावत नाही. गडचिरोली जिल्ह्यात लाकूड तस्करांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने शस्त्रे पुरविली आहेत. त्याच धर्तीवर या ठिकाणी शस्त्रे देण्याची गरज आहे.
जंगलात जावून अवैध कटाई करणारे ४० ते ५० मजूर समुहाने असतात. त्यांच्याकडे शस्त्रे असतात. वनकर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारवाई करण्यासाठी ते घाबरतात. परिणामी कोट्यावधीची वनसंपत्ती नष्ट होत आहे. भविष्यात ही स्थिती राहिली तर वनविकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्रातील जंगल व त्याला लागून असलेले जंगले भूईसपाट होण्यासाठी वेळ लागणार नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lack of facilities for forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.