युवतीला अमानुष मारहाण
By Admin | Updated: April 24, 2016 00:35 IST2016-04-24T00:35:54+5:302016-04-24T00:35:54+5:30
पिण्याचे पाणी दिले नाही म्हणून एका युवकाने कामावरील युवतीला अमानुष मारहाण केले.

युवतीला अमानुष मारहाण
रोजगार हमी योजनेवरील प्रकार : कान्हळगाव येथील घटना
मोहाडी : पिण्याचे पाणी दिले नाही म्हणून एका युवकाने कामावरील युवतीला अमानुष मारहाण केले. यात युवती बेशुध्द झाली. ही घटना कान्हळगाव (सिरसोली) येथे सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर शुक्रवारी घडली.
रोजगार हमी योजनेंतर्गत कान्हळगाव (सिरसोली) येथे रतिराम इटनकर ते तुकाराम बांते यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे मातीकाम सुरू आहे. या रोजगार हमीच्या कामावरील विनय चामट या मजूराने कामावरील आरती नामक गावातीलच युवतीला पिण्यासाठी पाण्याच्या बॉटलची मागणी केली. तरूणीने बॉटल दिली नाही, म्हणून संतप्त तरूणाने तिला अश्लिल शिवीगाळ करून काठीने जबर मारहाण केली. अमानुष मारहाणीदरम्यान युवकाने युवतीला जमिनीवर आपटले. एवढ्यावर तो न थांबता तिला लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. मारहाण होत असताना कोणीच अडविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट आरोपीचे संबंधित पावडे व काठ्या घेवून धावले. या अमानुष मारहाणीत तरूणी जागेवरच बेशुद्ध पडली. बेशुद्धावस्थेत तिला आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तरूणीचे वडीलांसह सुमारे ५० ते ६० मजूर आंधळगाव पोलीस ठाण्यात गेले. आरोपी युवकाला अटक करा, अशी मागणी मजूर करू लागले. याप्रकरणी पोलिसांनी विनय चामट याच्याविरूध्द कलम ३२३, ५०४, ५०६, १५१ (१), १०७, ११६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दोन दिवसापूर्वी आरोपी युवकाने मजूरांचे हजेरी घेण्याचे रजिष्टरही फाडले असल्याचे बोलले जात आहे.
आरोपीला साथ देणाऱ्या त्याच्या साथिदारांनाही अटक करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत उर्वरीत पांदन रस्त्याचे काम पूर्ण करू देणार नाही व अन्य ठिकाणी रोजगार हमी योजनेचे काम सुरू केल्यास त्या कामावर गावातील कोणतेही मजूर जाणार नाही, अशी भूमिका गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. तपास ठाणेदार मनोज काळबांधे यांचेकडे आहे. पीडित तरुणीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून पोलिसांच्या कारवाईकडे कान्हळगांववासीयांच्या नजरा लागल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांची भूमिका संदिग्ध
मोहाडी : गुन्ह्याचा स्वरूप मोठा असताना आंधळगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची फिर्याद रजिष्टर केली. तसेच आपसात वाद मिटवून टाकण्याचा सल्ला पोलिसांनी दिला यावरून पोलिसांची या प्रकरणात संदिग्ध भूमिका दिसत आहे.
तक्रारकर्ती युवती उपचार घेवून घरी परत आली. ती गोंधळलेल्या अवस्थेत होती. तिची कोणाशिही बोलण्याची इच्छा नव्हती. तिची मानसिक अवस्था वाईट असताना तिला बयानासाठी पोलिसांनी ठाण्यात बोलावले. पिडीत युवतीसह तिची बहिण व एक माजी ग्रा.पं. महिला सदस्या ठाण्यात गेले. साहेब जाब नोंदवतील. थोडावेळ बसा, असा सल्ला पोलिसांनी दिला. साहेब, मात्र घरी थंडाव्यात विश्रांती घेत होते. सायंकाळपर्यंत त्या तिनही महिलांना बसवून ठेवले होते. सायंकाळी आरोपीचे भांवड तक्रारकर्त्यांच्या घरी जावून वाईट शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत रोजगार हमीचे काम सुरु करण्यात येणार नाही, पोलिसांनी गावात येऊन सखोल चौकशी करून संबंधितांचे बयान नोंदवावे, मारहाणीत वापरण्यात आलेल्या काठ्या जप्त करण्यात याव्या, तक्रार नोंदविण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कान्हळगाव येथील नागरिकांनी दिला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)