सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर दीड कोटीची थकबाकी
By Admin | Updated: March 15, 2016 00:48 IST2016-03-15T00:48:15+5:302016-03-15T00:48:15+5:30
पाणीपट्टी करांची वाढती थकबाकी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने सिहोरा परिसरात वसुली सुरू केली आहे.

सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर दीड कोटीची थकबाकी
शेतकरी चौफेर संकटात : पाटबंधारे विभागाची वसुली सुरू
चुल्हाड (सिहोरा) : पाणीपट्टी करांची वाढती थकबाकी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने सिहोरा परिसरात वसुली सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांवर दिड कोटीची थकबाकी आहे. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भीषण दुष्काळाची वास्तविकता अनुभवल्याने शेतकरी चौफतर संकटात अडकला आहे.
सिहोरा परिसरात शेतकऱ्यांना खरिप आणि रब्बी हंगामात सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटपाची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाची आहे. या विभागात सिहोरा स्थित कार्यालयात उजवा व डावा कालवा अशी रचना करण्यात आली असून स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. २००७ पुर्वी या विभागाला ६ हजार ९६० हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्याची जबाबदारी होती. परंतु नंतर यात वाढ करण्यात आली. बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पुर्ण होताच १४ हजार हेक्टर आर शेती सिंचित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. १० ते ११ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यात आली आहे. यात यंत्रणा दोषी नाही.
नियोजन शुन्यतेमुळे शेतीत हरितक्रांती घडविण्याचे स्वप्न धुळीस प्राप्त झाले आहे. रिक्त पदाचा अनुशेष, नहर व कालव्याची जीर्ण अवस्था यामुळे सिंचित क्षेत्र वाढविता आलेला नाही. टेलवर पाणी पोहचविण्याची समस्या आजवर निकाली काढण्यात आली नाही. प्रभारी शाखा अभियंते, कनिष्ठ लिपिक आदीचा अनुशेष असल्याने कार्यालयात फक्त रिकाम्या खुर्च्या आहेत. कर्जचाऱ्यांचा अभाव असल्याने पाणी पट्टी कराची वसुली अनेक वर्षापासून प्रभावित ठरत आहे. सेवा निवृत्तीचे उंबरठ्यावर असणारे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी गावात वसुलीसाठी हिंडत आहे. १० घरांची वसुली नंतर थकवा त्यांना माघारी परतण्यास बाध्य करित आहे.
उजवा कालवा अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून ८२ लाख ४४ हजार व चालु वर्षाची ६ लाख २१ हजार रूपयाची थकबाकी आहे. याशिवाय डावा कालवा अंतर्गत ३५ लाख ६३ हजार व चालु वर्ष ४ लाख २१ हजार रूपये थकीत आहे, असे एकूण १ कोटी २८ लाख ४९ हजार रूपयाची थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे. दरम्यान यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रती एकरात २८० किलो धानाचे उत्पादन झाले आहे.
यामुळे थकबाकीची वसुली प्रभावित झाली आहे. याशिवाय महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पांचा वीज पुरवठा गेल्या वर्षापासून खंडीत करण्यात आला आहे. कोट्यवधीचा प्रकल्प भंगारात निघण्याच्या स्थितीत आहे. (वार्ताहर)
रिक्त पदांचे संकट
सिहोरा परिसरात पाणी वाटप, पाणी पट्टी करांची वसुली, या शिवाय विकास कामे करण्यासाठी पाठबंधारे विभागाची यंत्रणा असली तरी कार्यालय ओसाड असल्याचे चित्र आहे. दोन शाखा अभियंते प्रभारी आहेत. कनिष्ठ लिपिक, शाखा कारकून नाहीत. येत्या आक्टोबर महिन्यात तीन व चार चे कर्मचारी सेवा निवृत्त होत आहेत. यामुळे या कार्यालयाची धुरा मजुराच्या खांद्यावर येणार आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यांचा वाणवा असल्याने विकास कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचा अभाव आहे. यामुळे विकास कामाची गुणवत्ता दिसून येत नाही.
चांदपूर जलाशय अंतर्गत शेती सिंचित करणाऱ्या शेतकऱ्याकडे १ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याने पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित होत आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे.
-वाईनदेशकर,
शाखा अभियंता, सिहोरा.