राजापूरच्या घृणास्पद घटनेने मानवतेला कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:23 PM2020-07-26T22:23:15+5:302020-07-26T22:25:22+5:30

घरच्यांना तिला बाहेरची बाधा झाल्याचा संशय आला आणि तेथून सुरु झाला अंधश्रद्धेचा खेळ. एका मांत्रिकाकडे नेण्यातही आले. दरम्यान गुरुपौर्णिमेच्यादिवशी अर्थात अखाडीला सदर महिलेच्या अंगात आले आणि ती गावातील कुंदन गौपालेच्या घरी पोहोचली. तेथे जाऊन ती बेशुद्ध पडली. तुझाच घरी ती का आली याचा खुलासा कर म्हणून वाद सुरु झाला. यासोबतच कचरु राऊत, ओमप्रकाश मेश्राम, मनोहर गोटे यांचीही नावे पुढे आली.

Humanity is disgraced by the heinous incident of Rajapur | राजापूरच्या घृणास्पद घटनेने मानवतेला कलंक

राजापूरच्या घृणास्पद घटनेने मानवतेला कलंक

Next
ठळक मुद्देचौघांची नग्न धिंड : अंगात आलेली महिला तुझ्याच घरी का आली, यावरुन सुरु झाला खरा वाद, गावकरी ठरले घटनेचे मूकदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विज्ञानाने कितीही प्रगती केली आणि शासनाने जादूटोणाविरोधी कायदे केले तरीही अंधश्रद्धेचा पगडा समाजावर आजही कायम असल्याचा प्रत्यय तुमसर तालुक्याच्या राजापूर येथे आला. जादूटोण्याच्या संशयावरुन चौघांची नग्न धिंड काढण्यात आली. मारहाण करुन जीवंत जाळण्याचा प्रयत्नही झाला. या सर्व घटनेचे गावकरी मात्र मूक दर्शक ठरले. माणुसकीला कलंक लावणाऱ्या राजापूरच्या घटनेने समाजमन हादरुन गेले आहे.
तुमसर तालुक्यातील राजापूर ५०० उंबरठ्याचे गाव. राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन आणि विचारांवर गाढ श्रद्धा असेले गाव. मात्र शनिवारी रात्री या गावात आक्रित घडले. प्रेमविवाह करुन आलेली एक विवाहिता गरोदर होती. त्या काळात ती आजारी पडली. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अशातच दोन महिन्यापूर्वी तिचे बाळंतपण झाले. मात्र ती आजारीच असायची. घरच्यांना तिला बाहेरची बाधा झाल्याचा संशय आला आणि तेथून सुरु झाला अंधश्रद्धेचा खेळ. एका मांत्रिकाकडे नेण्यातही आले. दरम्यान गुरुपौर्णिमेच्यादिवशी अर्थात अखाडीला सदर महिलेच्या अंगात आले आणि ती गावातील कुंदन गौपालेच्या घरी पोहोचली. तेथे जाऊन ती बेशुद्ध पडली. तुझाच घरी ती का आली याचा खुलासा कर म्हणून वाद सुरु झाला. यासोबतच कचरु राऊत, ओमप्रकाश मेश्राम, मनोहर गोटे यांचीही नावे पुढे आली. गावात यावरुन वाद सुरु होता. त्यामुळे २३ जुलै रोजी गावाच्या हनुमान मंदिरावर सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि बीट जमादाराच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावरुन जाब विचारण्यात आला. त्यावरुन पोलिसांनी दोन्ही पार्टीत समझोता करुन प्रकरण थांबविले.
मात्र सदर महिलेच्या अंगात येणे सुरुच होते. शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गावातील चौकात काही तरुण एकत्र आले. या प्रकरणाचा जाब विचारलाच पाहिजे, असे म्हणू लागले. तेवढ्यातच या चौघांच्या घरी जावून काही तरुणांनी त्यांना मिटींग आहे, चौकात चला असे म्हणत त्यांना तेथे आणले. गावातील नागरिकांचीही गर्दी होवू लागली. सुमारे ३०० जण त्याठिकाणी जमले होते. काहींनी या चौघांचे नॉयलॉनच्या दोरीने हातपाय बांधून मारहाण करण्यास सुरुवात झाली.
काही वेळातच त्यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून नग्न करण्यात आले. कुणीतरी रॉकेल ओतून कपडे पेटवून दिले. हात-पाय बांधलेल्या अवस्थेत या चौघांची गावातून नग्न धिंड काढण्यात आली. त्यावेळी अनेकांनी या चौघांना बेदम मारहाण केली. आमचा काही संबंध नाही. आम्हाला सोडा, अशी विनवणी चौघेही करीत होते. परंतु धिंड काढणारे कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
गावकरीही मूकदर्शक होऊन हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते. यात महिलांचा समावेश होता. परंतु कुणीही साधी पोलिसांना सूचना दिली नाही. त्यानंतर या चौघांना पुन्हा चौकात आणण्यात आले. मारहाण करुन बॉटलमधील पेट्रोल अंगावर फेकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. दरम्यान अचानक पावसाची जोरदार सर आली आणि या चौघांचाही जीव वाचला.
हा सर्व प्रकार सुरु असताना कुंदनच्या पत्नीने गोबरवाही पोलिसांना फोन केला. रात्री १.४५ वाजता पोलीस राजापूरमध्ये पोहोचले. त्यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांनी बळाचा वापर करीत या चौघांनाही सुखरुप बाहेर नेले. त्यावेळी या चौघांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यानंतर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
एसपींनी घेतली बैठक
घटनेची माहिती होताच जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख गजानन कंकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी जिल्हा पोलीस अधिक्षक साळवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांची हजेरी घेत पोलीस अधीक्षकांनी या घटनेची माहिती तात्काळ का दिली नाही, असे म्हणत चांगलीच कानउघाडणी केली. दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकारी राजापूर येथे तळ ठोकून होते. सायंकाळी गोबरवाही पोलीस ठाण्यातही बैठक घेऊन तपासाबाबत सूचना देण्यात आल्या.

या २४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पोलिसांनी धिंड प्रकरणात योगेश चोपकर, देवा चोपकर, रवी राऊत, महेंद्र राऊत, अविनाश मेश्राम, मच्छिंद्र परबते, निरंजन परबते, सुखदेव परबते, राजकुमार घोनाडे, राजेंद्र गुर्जर, प्रतीक मकराम, प्रविण परबते, विशाल मेश्राम, आकाश वघारे, रिची डोंगरे, शिशिर डोंगरे, आशा चोपकर, मनिषा चोपकर, सुनंदा झोडे, शामकला राऊत, जयकला राऊत, विनिता परबते, ओमकला झोडे सर्व रा.राजापूर आणि नौशाद पठाण रा. गोबरवाही यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द भादंवि ३०७, ३५३, ३४१, ३२३, ३२४, १४३, १४८, १४९, ५०४ सहकलम २(१) (ख), ७, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गावाला छावणीचे स्वरुप
धिंड प्रकरणानंतर पोलिसांनी राजापूर येथे चोख बंदोबस्त लावला आहे. एस. बी. सेलोकर यांच्या नेतृत्वात भंडारा कमांडोचे पथक येथे तीन दिवस तैनात राहणार आहेत. गावाला छावणीचे स्वरुप आले असून गावात फेरफटका मारला. तेव्हा गावात स्मशान शांतता दिसत होती. कुणीही या विषयावर बोलायला तयार नव्हते.

गावाचा प्रश्न आहे, तुम्ही हस्तक्षेप करु नका
गोबरवाही पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रात्री १.४५ वाजता ठाणेदार युवराज म्हसकर यांच्यासह पोलीस पथक राजापूरात पोहाचेले. त्यावेळी चौघेही गावकऱ्यांच्या ताब्यात होते. पोलिसांनी या चौघाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव टाकला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करुन चौघांनाही पोलिसांच्या वाहनात बसविले. त्यावेळी संतापलेले नागरिक पोलिसांच्या हातून ओढण्याचा प्रयत्न करीत होते. हा आमच्या गावचा प्रश्न आहे. यात तुम्ही हस्तक्षेप करु नका, असे गावकरी पोलिसांना सांगत होते.
तर घटना टळली असती
या प्रकरणातील पिडीत कुंदन गौपाले हा घटनेच्या काही तास आधी गोबरवाही पोलीस ठाण्यात पोहोचला होता. त्याने गावात आपल्या जीवाला धोका आहे, असे सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला परतुन लावले. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा घृणास्पद प्रकार टाळता आला असता.

Web Title: Humanity is disgraced by the heinous incident of Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस