दिघोरीत घराला आग
By Admin | Updated: April 13, 2016 00:44 IST2016-04-13T00:44:09+5:302016-04-13T00:44:09+5:30
येथील मधुकर गंगाराम करंजेकर यांच्या घराला अचानक आग लागली. घराजवळील नागरिक आग विझविण्यासाठी धावून आले त्यामुळे आग आटोक्यात आली.

दिघोरीत घराला आग
दिघोरी (मोठी) : येथील मधुकर गंगाराम करंजेकर यांच्या घराला अचानक आग लागली. घराजवळील नागरिक आग विझविण्यासाठी धावून आले त्यामुळे आग आटोक्यात आली.
मधुकर करंजेकर यांचे घर दाट लोकवस्तीत आहे. घटनेच्यावेळी घरात कुणीच नव्हते. विद्युत कनेक्शनही घरात चालू नसल्याने नेमकी आग कशामुळे लागली असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. घराजवळीलच लालचंद करंजेकर यांनी तत्परता दाखवून पाण्याचा टँकर बोलविला. टँकरमधील पाणी घरावर बादल्यांच्या सहायाने परिसरातील तरूणांनी घरावर टाकले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
घटनेची माहिती ठाणेदार बी.जे. यादव व सरपंच शंकरराव खराबे यांना मिळताच त्यांनी अग्निशामक विभागाला फोन केला असता भंडारा येथील अग्निशामक वाहन मुजबी येथे गेल्याचे कळले.
पवनी येथे चालकच नसल्याची माहिती मिळाली तर वडसा येथील अग्निशमन गाडी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्वत: ठाणेदार यादव व सरपंच खराबे यांनी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी सर्वतोपरी आग विझविण्यास मदत केली.
या आधी सुद्धा परिसरात अनेक आगीच्या घटना घडल्या असून अग्निशामक विभाग कधीच उपयोगी पडला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांनी प्रत्येक तालुक्यासाठी एक अग्निशामकची गाडीची व्यवस्था करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा दुर्घटना घडल्यास लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्याची मागणी दिघोरी व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)