गवराळावासीयांनी दिली रंगाला तिलांजली'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:29+5:30
गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मीक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते.

गवराळावासीयांनी दिली रंगाला तिलांजली'
हरिश्चंद्र कोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली बु.: होळीनंतरचे धुलीवंदन म्हणजे विविध रंगाची उधळण करीत बेधूंद होऊन नाचण्याची आनंददायी पर्वणी. या सणाला संपूर्ण देशात सर्व आबालवृद्ध देहभान विसरुन विविध रंगांनी न्हाऊन निघतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील गावकऱ्यांनी गेल्या २८ वर्षापासून धुलीवंदनाला रंग न खेळण्याची परंपरा जोपासली आहे.
या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मीक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते. अशा या श्रम प्रतिष्ठेला चालना देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे १९ मार्च १९९२ रोजी निधन झाले. आपल्या जीवनयात्रेच्या अंतिम दिवशीही त्यांनी मंदिराचे अपूर्ण बांधकाम पूर्ण केले. तो दिवस होळीचा होता. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. त्यावेळी शोकमग्न गवराळावासीयांनी होळी साजरी न करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प अद्याप अबाधित आहे. होळीच्या दिवशी सर्वत्र विविध रंगाची उधळण करीत आचकट विचकट मौजमजा केली जाते. मात्र गवराळा येथे कर्मयोगी किसनबाबा अवसरे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. धुलीवंदनाच्या दिवशी गोपालकाल्याने या महोत्सवाचा समारोप होतो. या कार्यक्रमात गावातील सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. अशाप्रकारे येथील ग्रामवासी रासायनिक अथवा नैसर्गिक रंगांएवजी भक्तीरसात न्हाऊन निघतात. पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक जनजागृतीपर कार्यक्रम, सामूदायीक ध्यान, सामूदायीक प्रार्थना, कीर्तन, भारूड, भजन, दिंडी आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचºयाची प्रतिकात्मक होळी पेटविली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी ग्रामगीता तत्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य आदी विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करतात. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संतांच्या सहवासात दरवर्षी साजरा केला जातो.
आदर्श परंपरा जोपासण्याची गरज
राज्यात सर्व होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करुन लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रुपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. त्यामुळे पर्यावरणची हानी होते. गवराळावासीयांनी या सर्व प्रकारांना तिलांजली देऊन आपला एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या गवराळावासीयांचा आदर्श व परंपरा इतर गावकºयांनी जोपासण्याची गरज आहे.