करडी ग्रामसभेत गदारोळ
By Admin | Updated: July 12, 2014 00:53 IST2014-07-12T00:53:03+5:302014-07-12T00:53:03+5:30
करडी ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व गावकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यातील समझोत्यानुसार दि.९ जुलै रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

करडी ग्रामसभेत गदारोळ
करडी : करडी ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व गावकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यातील समझोत्यानुसार दि.९ जुलै रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. आक्रमक ग्रामस्थांनी विविध मुद्यावर ग्रामप्रशासनाला घेरले. प्रचंड ताणतणावाची स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीतही ६ तास वादळी ग्रामसभा झाली. विविध गैरप्रकारांचे वरिष्ठांकडून चौकशीचे ठराव मंजूर करण्यात आले.
विशेष ग्रामसभा वादळी होण्याची शक्यता असल्याने ग्रामप्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागविला होता. ग्रामसेवक संपावर असल्याने प्रोसिडिंगबुक लिहण्यासाठी जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.पी. साठवणे, पर्यवेक्षक म्हणून एल.जे. कुंभरे यांची नियुक्ती बिडीओंच्या आदेशानुसार करण्यात आली. दुपारी १२ वाजता ग्रामसभेला सुरूवात झाली. मात्र पर्यवेक्षक वेळेवर न आल्याने गावकऱ्यांनी बिडीओंना अनेकदा विचारणा केली. सुरूवातीपासून गावकरी आक्रमक होते. वादविवाद वाढत गेल्याने नवी कोरी प्रोसिडिंगबुक बाहेर फेकली गेली नंतर मात्र सांमजस्याने चर्चा घडवून ग्रामसभेला सुरूवात झाली. ग्राम प्रशासनाला घाम फुटेपर्यंत प्रश्न विचारले गेले. काही प्रश्नांवर प्रशासनाला उत्तरे देता आली नाही. रोष वाढत राहिला.
गावात ३ महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा करून नागरिक विविध आजाराने त्रस्त करण्याला दोषी कोण, आजारपणावर झालेल्या खर्चाची भरपाई कोण देणार, दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, आदी विषयावर सरपंच सिमा साठवणे, उपसरपंच चंद्रकांत सेलोकर व पदाधिकाऱ्यांना जाब विचारला गेला. नवीन पाणीपुरवठा योजना, जि.प. हायस्कूल येथे झालेले बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आवारभिंतीचे उंचीकरण, बिले, चेकबूक आदी संबंधिची माहिती विचारली गेली. महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत नवीन व गणपती तलावाचे खोलीकरण सन २०१४ करण्यात आले. त्यामध्ये ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी गैरप्रकार केला. नियोजनानुसार कामे न करता मनमानी करण्यात आली. याप्रकरणी चौकशी वरिष्ठांनी करावी, असे ठराव सर्वानुमते घेण्यात आले. विविध विषयांची माहिती देण्यास सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी कमी पडल्याने तसेच ग्रामसेवक उपस्थित नसल्याने कागदपत्रे दाखविली गेली नसल्याने पुन्हा बीडीओ, अभियंते, वैद्यकीय अधिकारी, रोजगार सेवक व संबंधित कामांचे अधिकारी यांना पत्र देवून उपस्थित ठेवून खंड विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलविण्याचे ठराव मंजूर केले गेले. कामांचे चेक व दाखले बरोबर असतानाही सरपंच सही करीत नाही. मानसिक त्रास देतात याविषयी सुद्धा सरपंच महोदयांना उत्तरे मागितले गेले. विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सिमा साठवणे होत्या. यावेळी प्रोसिंग अधिकारी म्हणून मुख्याध्यापक एस.पी. साठवणे, पर्यवेक्षक म्हणून विस्तार अधिकारी कुंभरे, चंद्रकांत सेलोकर, अश्विन मेहर, डॉ.झोडे, डॉ.शेख, उमेश इलमे, अयुब शेख, हेमंत भडके, सियाराम साठवणे, कुंडलिक ढबाले, भूषण बांते, मुकेश आगासे, वामन राऊत व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.(वार्ताहर)