लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:06+5:302021-03-14T04:31:06+5:30
मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना ...

लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल द्या
मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु मोहाडी तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या घरकुलाच्या ‘ड’ यादीचा ग्रामपंचायत ऑपरेटर व सचिवांनी सर्व्हे करते वेळी दुजाभाव करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून त्यांचे अर्ज ऑनलाइन केले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ‘ड’ यादीनुसार खऱ्या लाभार्थ्यांची नावे सुटल्याने घरकुलांच्या ‘ड’ यादीत मोठा घोळ झाला आहे. तरी तत्काळ दुरुस्ती करून ग्रामपंचायीच्या ठरावानुसार ‘ड’ यादीतील नाव सुटलेल्या लाभार्थीचे नाव ऑनलाइन करून गरजवंत लाभार्थींचा ‘ब’ यादीत समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष व माजी ग्रा.प. सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.
मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द, पिंपळगाव, उसर्रा, आंधळगाव, बडेगाव, डोंगरगाव, काण्हळगाव, टांगा, ताडगाव, धोप, जांब, हिवरा, हरदोली, काटी, कान्द्री आदी गावांत नाव सुटलेल्या लाभार्थींबरोबर सरपंच यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सालई खुर्द येथील रामदास लिल्हारे, दिलीप मांढरे, कुशवलाल लिल्हारे, भगवान नागपुरे, शिवलाल मांढरे, प्रभू लिल्हारे, फिरतलाल सव्वालाखे, मनोज आंबाडारे, रवींद्र चचिरे, दुलीचंद उरकुडे, संकपाल ठाकरे, विठोबा मेश्राम, राजेंद्र मेश्राम, अर्जुन लिल्हारे, राजू अटराहे आदी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने हे लोक अजूनही कच्च्या घरातच वास्तव्यास आहेत.
ज्यांचे बीपीएल यादीत नाव असेल, अशा लाभार्थ्यांनाच पूर्वी घरकुलाचा लाभ मिळत असे. त्यामुळे पात्र असूनही अनेक लोकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ज्यांचे कौलारू घर असेल, मातीचे, कुडाचे किंवा कच्च्या विटांचे असेल, अशा लाभार्थ्यांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी घरकूल योजना तयार केली आहे. परंतु, मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील शेकडो लाभार्थी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे घर मातीचे व कौलारू आहे. पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने घरावर झाकण्यासाठी पाल घ्यावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते.
अनेकांना पक्के घर असूनही घरकुलाचा लाभ मिळाला आहे. परंतु, पात्र असूनही काही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मोडक्या, कच्च्या घरातच दिवस कंठावे लागत आहेत.
खोट्यांना लाभ, खरे वंचित
सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना अनेक सवलती व विविध योजनांचे लाभ दिले आहेत. पण, काही जणांनी आर्थिकदृष्ट्या सधन असतानाही दारिद्र्यरेषेखालील अर्थात बीपीएल यादीत आपले नाव चढविले आहे. असे नागरिक घरकूल व इतर अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. अशा खोट्यांना लाभ मिळत असताना खरे गरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. जिल्हाभरात अशी अनेक प्रकरणे असून, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष व मा. ग्रामपंचायत सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.