जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:50 IST2018-10-03T21:49:48+5:302018-10-03T21:50:06+5:30
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना दोन वाहनांसह अटक करण्यात आली. ही कारवाई पवनी-अड्याळ मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी ७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आठ बैलांची सुटका केली.

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना दोन वाहनांसह अटक करण्यात आली. ही कारवाई पवनी-अड्याळ मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी ७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आठ बैलांची सुटका केली.
हेमराज जगन्नाथ नंदूरकर (२८), शिशूपाल मन्साराम मानकर (३६), नीलेश विठोबा वाढवे (२२) तिघेही राहणार नावेझरी ता.तिरोडा जि.गोंदिया आणि सूर्यकिरण वासुदेव उईके (६०) रा.बोरगाव ता.तिरोडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अड्याळचे ठाणेदार सुरेश ढोबळे व सहकारी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अड्याळ पवनी मार्गावर गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना दोन वाहने संशयास्पदरित्या जाताना दिसली. या वाहनांना अडवून तपासणी केली असता प्रत्येक वाहनात चार बैल आढळून आले. परवानगी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेच कागदपत्रे आढळून आले नाही. त्यामुळे या चौघांना अटक करण्यात आली. तसेच महिंद्रा बोलेरो पीकअप वाहनही जप्त करण्यात आले. या जनावरांची अमानवीय पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश ढोबळे, शिपाई मिलिंद बोरकर, सत्यराव हेमणे यांनी केली.