जिल्ह्यात पूर ओसरतोय पण संकट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:42+5:30
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसर, मेंढा, ग्रामसेवक कॉलनी, काझीनगर, प्रगती कॉलनी, यासह अन्य क्षेत्रात पुराचे पाणी शिरल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले. नावेच्या सहाय्याने बाहेर काढले जाईल अशी प्रशासनाकडून अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मात्र काही ठिकाणी ही अपेक्षा सपेशल फेल ठरली. पूर येण्याची माहितीच नसल्याने अनेकजण अचानक संकटात सापडले.

जिल्ह्यात पूर ओसरतोय पण संकट कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मध्यप्रदेश येथील संजय सरोवरचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही अनेक मार्ग बंद आहेत. हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाली असली तरी समस्यांचा डोंगर कायम आहे. मदतीसाठी नागरिकांचा टाहो ऐकायला मिळत आहे.
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसर, मेंढा, ग्रामसेवक कॉलनी, काझीनगर, प्रगती कॉलनी, यासह अन्य क्षेत्रात पुराचे पाणी शिरल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले. नावेच्या सहाय्याने बाहेर काढले जाईल अशी प्रशासनाकडून अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मात्र काही ठिकाणी ही अपेक्षा सपेशल फेल ठरली. पूर येण्याची माहितीच नसल्याने अनेकजण अचानक संकटात सापडले. वेळीच शेजारील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते धावुन आल्याने अनेकांचा जीव बचावला. गणेशपूर येथे स्थानिक प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त करण्यात आला. येथील सामाजिक कार्य करणाऱ्या आदर्श युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने नावेची व्यवस्था करीत अनेकांना बाहेर काढले. यासाठी या मंचचे पदाधिकारी पवन मस्के, अंकित खोब्रागडे, लुकेश जोध, संजु मते, मोनु बांते, मोनार्च शेंडे, चिराग गुरनुले, आयुश भोंडे, विकी रामटेके, जतीन खापरे, चेतन जोध, रुद्र वैद्य, मयुर कुथे, मोहित मडामे यासह अन्य इसमांनी मदत केली. विशेष म्हणजे भुकेलेल्यांना जेवन देण्यात आले.
दरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी पुरपरिस्थितीची पाहणी केली. अनेकांना मदतीचा हात देत त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करुन दिली.
आमदार राजु कारेमोरे यांनी भंडारा - वरठी मार्गावर अडकलेल्या शेकडो ट्रक चालक व क्लिनरसाठी जेवणाची व्यवस्था केली. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही पुर बाधितांची आस्थेने चौकशी करीत त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली.
लाखांदूर तालुक्यात दोन गावे पुराच्या पाण्याने पुर्णत: बाधित झाली. गोसेखुर्द येथून पाण्याचा विसर्ग होत असल्याने लाखांदूर तालुक्यातही याचे दुष्परिणाम जाणवला. हजारो हेक्टरमधील धानपीक पाण्याखाली आले. अनेकघरांची पडझड झाली. वैनगंगा व चुलबंद नदी तिरावरील गावांना याचा जबर फटका बसला. अंतर्गत रस्त्यांवरील पुलावर पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले. चुलबंद नदीकाठावरील दिघोरी बारव्हा दांडेगाव, चिचोली, भागडी, मांढळ, आथली, आसोला, चप्राड, सोनी तर वैनगंगा नदीतिरावरील इटान, मोहरणा, खैरना, डांबेविरली, खैरीपट, टेंभरी, विहिरगाव, आवळी या गावांना पुराचा तडाखा बसला. बारव्हा-तई, लाखांदूर- वडसा रस्ता सकाळपासूनच बंद आहे. चप्राड पहाडीजवळ रस्त्यावर सहा फूट पाणी वाहत असल्याने परिसरातील वस्तीत पाण्याचा शिरकाव झाला. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी, नागरिकांनी केली आहे.
कुंभलीचे तलाठी सीडाम यांना सर्पदंश
साकोली : तालुक्यातील कुंभली येथील तलाठी दिनेश सीडाम यांना भंडारा येथे सापाने दंश केला. त्यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे. दिनेश सीडाम हे कुंभली येथे कार्यरत असून शनिवारी ते भंडारा येथे भोजापूर येथे गावी आले होते. दिनेश सीडाम यांच्या घरी पुराचे पाणी शिरले. सामान काढीत असताना पाण्याच्या प्रवाहात आलेल्या एका सापाने त्यांना दंश केला. त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे सांगण्यात येते.
ंआपत्तीत सापडलेल्यांना मदतीचा हात
पुराच्या पाण्याने वेढल्या गेलेल्या घरातील नागरिकांना मदतीचा हात देण्यात येत आहे. जवाहरनगर, पिंपरी येथे एसडीआरएफच्या पथकाने ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. मोहाडी व तुमसर तालुक्यात दुसºया चमुद्वारे ७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सर्वांची तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. जिल्ह्यात ११ बोटींद्वारे शोध व बचाव कार्य करण्यात येत आहे. पवनी तालुक्यात ७२७४ व्यक्ती बाधित झाले आहेत. तुमसर तालुक्यात ५२८ जणांसाठी पाच आपत्ती केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. भंडारा तालुक्यात सर्वात जास्त नुकसानग्रस्त असून अशा व्यक्तींची संख्या १३८११ आहे. २४ केंद्रांमधून या पुरग्रस्तांची मदत केली जात आहे. मोहाडी तालुक्यात २६ हजार नागरिक बाधित झाले असून त्यांच्यासाठी ७८ मदत केंद्र उभारण्यात आले आहे.
शहरात दुध पुरवठा ठप्प
भंडारा : शहरात रविवार दुपारपासून दुधाचा पुरवठा न झाल्याने दुधाची कमतरता जाणवली. शहरातील मुख्य दुग्ध डेअरी असलेली जैन डेअरी बंद होती. ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या पशुपालकांकडूनच दुध विकले जात होते. भंडारा वरठी मार्ग बंद असल्याने दाभा जमनी येथील दुध संकलन केंद्रातून दुधाचा पुरवठा होऊ शकला नाही. मार्ग उघडल्यानंतर पुर्ववत दुधाचा पुरवठा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत देणार -विश्वजीत कदम
भंडारा : जिल्ह्यात अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनपेक्षित संकट उभे ठाकले असून प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली. परिस्थिती गंभीर असून आता वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढणार नाही असे त्यांनी सांगितले. पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ५८ गावांना या पुराचा विळखा बसला असून १९ हजाराच्या आसपास नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे १६३ सदस्य जवान कार्यरत आहेत. ३० बोटींच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता जनतेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. माझ्या ट्रस्टकडून विविध शिबिरामध्ये आश्रय घेतलेल्या पूरग्रस्तांसाठी २५ हजार मास्क पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूरबाधीत गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. अशी पूरपरिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी २४ तास आधी मध्यप्रदेश सरकारकडून माहिती मिळावी यासाठी आपण पत्रव्यवहार करणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवाभावी संस्थांनी पुढे यावे - नाना पटोले
भंडारा जिल्ह्यात अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. संजय सरोवर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ४४० मिमी पाऊस झाला. कन्हान, बावनथडी आदी नद्यांना पूर आला. हे सर्व पाणी वैनगंगेत आले. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती, घर व घरातील साहित्याचे नुकसान भरपाई दिली जाईल. दोन दिवसात सर्वेक्षणाला प्रारंभ होईल. संकटाच्या काळात घाबरून न जाता परिस्थितीशी सामना करावा.
पुराच्या पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू
लाखांदूर तालुक्यातील खैरला येथे पुर पहायला गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. नामदेव श्रावण पचारे रा. खैरणा असे मृताचे नाव आहे. पाय घसरल्याने नामदेव हे खोल पाण्यात कोसळले. यातच त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी २ वाजता घडली. सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह आढळला. तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.
डोंगरलात पुराचा वेढा
तुमसर : शहराजवळील डोंगरला स्मशानघाट पुणर्त: पाण्याखाली आला आहे. डोंगरला नाला पुर्णत: भरला आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर डोंगरला स्मशानघाट आहे. परिसरात असलेल्या मंदिरातही पाणी शिरले असून घाटाला पुराने वेढा घातला आहे. सोमवारी पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली. काही ठिकाणी पुराचे पाणी कायम आहे. भात शेतीला पुराने मोठा फटका बसला आहे.