पाणीपट्टी भरा, उपसा सिंचनचे पाणी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:49+5:302021-07-14T04:40:49+5:30
अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे ...

पाणीपट्टी भरा, उपसा सिंचनचे पाणी घ्या
अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट अक्षरात गावागावातील चौकाचौकात पॉम्प्लेट लावण्यात आले आहेत. पाणी कर भरा अन् उपसा सिंचनाचे पाणी घ्या, अशी बळीराजाला संकटात घालणारी बाब समोर आली आहे.
पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन यासाठी सुरू होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आधीच पाण्याची पातळी योग्य प्रमाणात करून ठेवली असल्याची माहिती आहे.
मागील गुरुवारी आलेल्या पावसामुळे कसे तरी पऱ्हे जगताहेत; पण जोपर्यंत रोवणी करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पीकही येणार नाहीत. अशा बिकट परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कुठलीही पर्वा न करता असलेली पाणीपट्टी भरली; पण आता बाकीचे शेतकरी पाणीपट्टी जर भरत नसतील तर ही चूक कुणाची? ज्यांनी पाणीपट्टी तात्काळ भरली ते मूर्ख आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. यावर संबंधित विभागाने विचार करण्याची गरज आहे.
मागील चार वर्षांचा इतिहास नेरला उपसा सिंचन योजनेचा बघितला तर बळीराजाला या सिंचन योजनेमुळे लाभच होत गेला. यात काही शंका नाही; पण नेहमीच शेतकरी का फसतो, का अडकतो, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांना पाणी कर भरल्याशिवाय शेतीला पाणी मिळणार नाही, असे कळताच काही शेतकऱ्यांनी तात्काळ पैसे भरले; पण आजही असंख्य शेतकऱ्यांनी पाणी कर भरला नाही. यामुळे जणू कर भरला तेही अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. ६३० रुपये हेक्टर जर पकडले तर जास्तीत जास्त २५० रुपये प्रतिएकर भरायचे आहेत. याचाही विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, असेही बोलल्या जात आहे.