खंडित वीज समस्येने १३ गावचे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:37+5:302021-04-03T04:31:37+5:30
पालांदूर : गत पंधरा दिवसांपासून गोंडेगाव फिडरवरून १३ गावांतील शेतकऱ्यांची वीज खंडित झाली असून, कृषी पंप ठप्प झाले आहेत. ...

खंडित वीज समस्येने १३ गावचे शेतकरी त्रस्त
पालांदूर : गत पंधरा दिवसांपासून गोंडेगाव फिडरवरून १३ गावांतील शेतकऱ्यांची वीज खंडित झाली असून, कृषी पंप ठप्प झाले आहेत. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर बागायत शेती धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. अन्यथा उपाेषणाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरठा, गोंडेगाव परिसरासह १३ गावांतील वीज समस्या गत पंधरा दिवसांपासून ऐरणीवर आलेली आहे. धान पिकासह बागायत क्षेत्र मोठे असल्याने सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत असल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कृषी फिडरला वीज नियमित नसल्याची समस्या मोठी आहे. २४ तासांत केवळ ८ तास वीज मिळत आहे. त्या ८ तासांत वीज खंडित होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. यासंबंधात स्थानिक तंत्रज्ञ मुख्यालयी राहात नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आठ तास वीजऐवजी बारा तास विजेचा पुरवठा करा, वीज तंत्रज्ञ बदलवून द्या व मुख्यालयी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन कनिष्ठ सहायक अभियंता मयंक सिंग यांना देण्यात आले आहे.