शेतात पडल्या भेगा, बळीराजा चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:01:10+5:30
गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतात पडल्या भेगा, बळीराजा चिंताग्रस्त
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
एकट्या अड्याळ आणि परिसरात पाण्याअभावी अजूनही रोवणी खोळंबलेली आहे. कुठे रोवणी करायला पाणी नाही तर कुठे भातरोप जगविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.
ज्यांच्या शेतात रोवणी झाली त्या जमिनीत भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून विशेषत: सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात पण बरसत नाही अशी स्थिती आहे. दुसरीकडे उन्ह - सावलीच्या खेळात उकाड्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नेरला उपसा सिंचन योजनेंतर्गत अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी नियोजन करीत असले तरी आताही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकारी अभियंता अनिल परखडे, सहाय्यक उपविभागीय अभियंता अमोल वैद्य, अजय कावळे, प्रशांत येळणे, सुनील भुरे व त्यांची चमू या कामात व्यस्त दिसून येत आहे.
उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले असले तरी काही शेतकरी इंजीनद्वारे पऱ्ह्यांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
कोरोना संकटात पाऊसही झाला लॉकडाऊन
खापा : जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जात असला तरी बहुतांश शेतकऱ्याची मदार नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे. खापासह अन्य परिसरात गत आठवड्याभरापासून पाऊस न बरसल्याने वरुण राजाही लॉकडाऊन झाला काय अशी चर्चा आहे. दरम्यान बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला प्रारंभ केला होता. पेरणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पऱ्हेही आले. मात्र त्या दरम्यान अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्यामुळे या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले होते.
अवकाळी संकटाचा सामना करीत असताना पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरविली आहे. दहा दिवसांपासून पाऊस न बरसल्याने पिके करपू लागली आहेत. पऱ्हे तांबूस व पिवळे दिसू लागले आहेत. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची पुन्हा एकदा गरज झाली आहे. नाहीतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी आर्थिक टंचाईलाही त्यांना सामोरे जावे लागेल.
दमदार पावसाची प्रतीक्षा
रोवणीनंतर पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसावा अशी शेतकऱ्यांची उमेद होती. मात्र आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही पाऊस बरसलेला नाही. एकट्या उपसा सिंचनच्या भरवशावर किती दिवस धान पीक टिकवून ठेवायचे असा विचारही बळीराजा करीत आहेत. परिसरातील शेतकºयांना पुन्हा एकदा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.