कंत्राटदारच करताहेत उमेदवारांचा खर्च
By Admin | Updated: July 22, 2015 01:15 IST2015-07-22T01:15:07+5:302015-07-22T01:15:07+5:30
ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे.

कंत्राटदारच करताहेत उमेदवारांचा खर्च
ग्रामपंचायत निवडणूक : पदाधिकाऱ्यांचा छुप्या बैठकांवर भर
करडी (पालोरा) : ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे. पंचायत राज पद्धतीमुळे ग्रामपंचायतीचे वजन वाढले तशा सर्वांच्या नजरा ग्रामपंचायत सत्ताकारणाकडे वळल्या. कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी पैसा ओतण्यास सुरूवात केली. करडी परिसरातील अनेक उमेदवारांना अशाच कंत्राटदारांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांचा संपूर्ण खर्च या कंत्राटदारांकडून होत आहे.
नवनियुक्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा छुप्या बैठकांना प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांतूनच राजकाराचा पाया रचला जातो. त्यामुळेच या निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसतसे ग्रामीण वातावरण ठवळून निघत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लढणारे, जिंकणारे व हरणारे पुढारी सुद्धा यात सामील झाले आहेत. हरणारे बदला घेण्याची भाषा वापरित असले तरी विजयी मात्र जनाधार वाढवून ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
करडी परिसरातील देव्हाडा, जांभोरा, खडकी, पांजरा बोरी, केसलवाडा आदी गावात ग्रामपंचायत निवडणुका रंगत आहेत. मागील पाच वर्षात एकदाही नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी न भटकणारे पदाधिकारी मतदारांच्या घरी घिरट्या घालत आहे.
पुन्हा एकदा संधी द्या, तुमच्या सर्व तक्रारी व अडचणी सोडविण्याची ग्वाही देण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या घरी राजकारण व राजकीय पद असावे म्हणून काहींनी सेटींग चालविली आहे. काटाकाटीचे, पाडापाडीच्या व्यूहरचना केल्या जात आहेत.
राजकारण झाला व्यवसाय
वारंवार खोटे आश्वासने देणारी मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असून एका संधीची भीक मतदारांकडे मागत आहेत. विकास कामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी राजकारणालाच व्यवसाय केले आहे. पुढील पिढ्यांची सोय आताच झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या योजना राबविल्या जातात. कामांचे कंत्राटही दिले जातात. यासंबंधातूनच राजकीय मंडळीचे नातेवाईक, स्वकीय, पैसा खर्चून कामे मिळविणारे कंत्राटदार गर्भ श्रीमंत झाले आहेत.
१० वर्षापूर्वी सायकलही घरी नव्हती ते चारचाकीने फिरताहेत. सोने-चांदी-दागदागिने, शेतीवाडी, घरेदारे आदी सुखवस्तूंची रेलचेल आहे. अल्पावधीत राजकारणाच्या पाठीवर उभे राहून मोठे झालेले कंत्राटदारच आज निवडणुकांत उमेदवार व मतदारांवर करावयाचा खर्च करताहेत. मर्जीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी, नावडत्यांना पाडण्यासाठी ताकत खर्ची घालत आहेत. कंत्राटदारांच्या राजकीय चुकीमुळेच अनेक गावातील कामे निकृष्ट दर्जाची, अर्धवट व कामात गैरप्रकार झाल्याचे घबाड उघडकीस येत आहेत. (वार्ताहर)