अखेर आसगावचे सरपंच पायउतार
By Admin | Updated: October 27, 2016 00:24 IST2016-10-27T00:24:14+5:302016-10-27T00:24:14+5:30
पवनी तालुक्यातील आसगाव येथील सरपंच राजेश भेंडारकर हे पदावरून पायउतार झाले आहेत.

अखेर आसगावचे सरपंच पायउतार
आयुक्तांचा निर्णय : ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती
आसगाव : पवनी तालुक्यातील आसगाव येथील सरपंच राजेश भेंडारकर हे पदावरून पायउतार झाले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लावणे व ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालावे नियुक्ती करण्याबाबत आदेश विभागीय आयुक्तांनी २४ आॅक्टोबरला पारीत केले आहेत.
माहितीनुसार, ३० मे २०१६ रोजी सरपंच राजेश भेंडारकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव ठेवण्यात आला होता. मात्र त्या दिवशी ग्रामपंचायतीचा एकही सदस्य उपस्थित नव्हते.
त्यामुळे अविश्वास ठराव पारीत झाला नाही.
त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ११ पैकी ७ सदस्यांनी स्वइच्छेने ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला. परिणामी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलमानुसार ग्रामपंचायत आसगाव विघटनाचा प्रस्ताव तसेच प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधिचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केला होता. त्यानुसार उर्वरीत ४ ग्रामपंचायत सदस्य यांची १७ आॅक्टोबर २०१६ ला मते जाणून घेण्यात आली.
तसेच २४ आॅक्टोबरला ग्रामपंचायतीचे विघटन न करता नवीन रिक्त जागेत निवडणूक होईपर्यंत पवनी पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी (पंचायत) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (वार्ताहर)
विभागीय आयुक्तांनी पंचायत राज अधिनियमानुसार उत्तम कार्य केले आहे. सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायत आसगावचे प्रशासन अल्प मतात आले होते. खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रशासकाची नियुक्ती व्हायला हवी होती. दरम्यान सदर निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- मंगेश पाटील ब्राम्हणकर
पंचायत समिती सदस्य, आसगाव.