बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार
By Admin | Updated: October 4, 2014 23:23 IST2014-10-04T23:23:19+5:302014-10-04T23:23:19+5:30
एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. त्यामुळे महिलांनी शिकणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ शकेल. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे जाळे निर्माण करुन

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार
बेला परिसरात प्रचार : देवांगणा गाढवे यांचा निर्धार
भंडारा : एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. त्यामुळे महिलांनी शिकणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ शकेल. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे जाळे निर्माण करुन महिलांचे सक्षमीकरण करणार असल्याचे प्रतिपादन बसपाच्या उमेदवार देवांगणा गाढवे यांनी केले.
बेला परिसरात आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा प्रभारी संजय भिवगडे, जिल्हाध्यक्ष संजय गाढवे, जिल्हा महासचिव प्रिया शहारे, सुरेश कोहळे, हेमलता गजभिये, मनोरमा मोटघरे, किरदास मेश्राम, विजय रंगारी उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या, राजकीय पक्षांकडून महिलांना आरक्षण देण्याच्या बाता केल्या जातात. परंतु, जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाने महिलांना संधी दिली नाही. पक्षाने उमेदवारी देऊन महिलांसाठी काम करण्याची संधी दिली आहे. त्याचा लाभ महिलांसाठी करण्याचा मानस आहे.
यावेळी त्या म्हणाल्या, महिलांचा विकास घडवून आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी महिलांचा फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे बचतगटांच्या माध्यमातून या योजना महिलांपर्यंत प्रत्यक्ष पोहचवून महिला सक्षमीकरणाचा आपला प्रयत्न राहणार आहे.
महिला बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, बचतगटांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांमुळे हे बचतगट कोलमडले आहे. त्यामुळे महिलांचा विकास रखडलेला असून त्याला गती देण्याची गरज आहे. यासाठीच महिला बचतगटांचे सहकारी संस्थांमध्ये परिवर्तन करून महिला सहकारी पतसंस्थांची निर्मीती करण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाचे पाणी दूषित होत आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शासनाला बाध्य केले जाईल. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व अन्य प्रवर्गांना न्याय, शेतीवर आधारीत उद्योगधंदे, शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजारपेठ तयार करण्यात येईल. बचगटांमार्फत या मालाची विक्र ी केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा दर्जा वाढेल. भंडारा, पवनी या शहरांना मॉडेल शहर म्हणून पुढे आणले जाईल. सिंचन सुविधेवर भर देऊन क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी आपला प्रयत्न राहील, असेही देवांगना गाढवे यांनी सांगितले.
महिला उमेदवारीमुळे अस्वस्थता
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघात यावेळी बहुजन समाज पार्टीने देवांगना विजय गाढवे या महिला उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे. भंडारा मतदारसंघ हा कुणबीबहुल आहे. जातीय समिकरण आणि नियोजनावर बसपाने भर दिला आहे. गाढवे या महिला असल्यामुळे मतदारसंघातील समिकरणे बदलले आहेत. नामांकन अर्जावरही आक्षेप घेण्यात आले होते परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फटाळले होते. कॉंग्रेसने युवराज वासनिक यांना उमेदवारी दिल्यामुळे जुने कार्यकर्ते दुखावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही तीच स्थिती आहे. युवाशक्ती संघटनेचे शशिकांत भोयर हे अपक्ष रिंगणात असून तरुणांची मते निर्णायक ठरणार आहेत. (नगर प्रतिनिधी)