वृद्ध आई सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:47+5:30
शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता. अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले आणि बाहेरून कुणाची मदत मिळते का म्हणून पंख्याला लटकून आवाज देऊ लागला. परंतु वाढत्या पुरात आणि किर्रअंधारात मदतीची अपेक्षाच नव्हती.

वृद्ध आई सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शनिवारची रात्र. अचानक पुराचे पाणी वाढू लागले. नागपूर नाका परिसरातील छत्रपती शिवाजी नगरही पाण्याखाली आले. एका घरात ७५ वर्षीय वृद्धा आणि तिचा ५२ वर्षीय मुलगा दोघेच होते. पुराचे पाणी चढत होते. क्षणाक्षणाला मरण दिसत होते.वृद्ध आईला सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून कुणाची मदत मिळते का याचा अंदाज घेत होता. अख्खी अन्नपाण्यावाचून काढल्यानंतर अखेर रविवारी दुपारी काही तरुणांचे लक्ष गेले. बोटीच्या मदतीने घर गाठून या दोघांना बाहेर काढले. एवढेच नाही तर या परिसरातील नऊ कुटुंबांनाही सुरक्षित हलविले.
वैनगंगेच्या महापुराने भंडारा शहरात हाहाकार उडाला. अनेकांची घरे पाण्याखाली गेली. नागपूर नाका परिसरातील छत्रपती शिवाजी नगरही पुराच्या पाण्याने वेढले गेले. याच परिसरातील राजेश देवराम चिंचखेडे (५२) आणि त्यांची आई अनुसया देवराम चिंचखेडे (७५) आपल्या घरात होते.
शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता.
अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले आणि बाहेरून कुणाची मदत मिळते का म्हणून पंख्याला लटकून आवाज देऊ लागला. परंतु वाढत्या पुरात आणि किर्रअंधारात मदतीची अपेक्षाच नव्हती. इंच इंच पाणी वाढत होते. समोर साक्षात मरण दिसत होते.
खासदार सुनील मेंढे यांनी मदतकार्यासाठी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या. रविवारी दुपारच्या वेळी सिल्ली येथील सुहास गजभिये, मौदी येथील बांते यांनी शिवाजी नगर परिसरात आपल्या बोटीने मदतकार्य सुरु केले. त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. जीव धोक्यात घालून हे दोघे घरात शिरले.
व्हेंटीलेटरची खिडकी तोडून आत प्रवेश केला. सज्जावर थंडीने कुडकुडत असलेल्या अनुसयाबाई आणि मुलगा राजेश यांना तात्काळ बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. आणखी काही काळ उशिर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. या मायलेकांना जलसमाधी मिळाली असती. मात्र तरुणांच्या धाडसाने या मायलेकांचा जीव वाचला.
जीवाची पर्वा न करता अनेकांना काढले बाहेर
शिवाजी नगर परिसरात अडकलेल्या नागरिकांना सिल्ली येथील तरुण सुहास गजभिये, विवेक गजभिये, विकास वाहाणे, अश्विन वाहने, राहुल वैद्य, जीतू मेश्राम, तुषार कढव यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. एक एक करून दिवसभरात नऊ कुटुंबातील ६० ते ६५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश् आले. स्थानिक तरुणांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला.