अतिवृष्टीने ८१ घरांची पूर्णत: तर १२०४ घरांची अंशता पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:49+5:30
गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस बरसला. अलिकडच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. अवघ्या २४ तासात १६३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती पिकांचेही नुकसान झाले. साकोली तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या तालुक्यातील ६६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून ५०३ घरे अंशत: बाधीत आहेत.

अतिवृष्टीने ८१ घरांची पूर्णत: तर १२०४ घरांची अंशता पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीत ८१ घरे पूर्णत: उद्वस्त झाली. तर १२०४ घरांचे अंशत: नुकसान झाले. या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडाला असून शेती नुकसानीचे सर्व्हेक्षण महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या पावसाने जिल्ह्यातील २६ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून ६३ प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा झाला आहे.
गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस बरसला. अलिकडच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. अवघ्या २४ तासात १६३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती पिकांचेही नुकसान झाले. साकोली तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या तालुक्यातील ६६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून ५०३ घरे अंशत: बाधीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील सात घरांचे पूर्णत: तर १२७ घरांचे अंशत: नुकसान झाले. मोहाडी तालुक्यात सात घरांचे पूर्णत: तर ३२५ घरांचे अंशत: नुकसान झाले. अनेक घरांच्या भींती आणि छत कोसळले. अनेकांचा आसरा हिरावला. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पावसाने धान पिकाला मोठा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आले. सर्व्हेक्षणानंतर नेमके किती नुकसान झाले, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात गत दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने नदीनाल्यांना पूर आला असून प्रकल्पात मुबलक जलसाठा निर्माण झाला आहे. भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सध्या ६३ प्रकल्पांमध्ये ७५.२४ टक्के जलसाठा असून ९१.६२ दलघमी उपयुक्त साठा आहे.
भंडारा जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी पावसाने कहर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या आसपासच्या शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मासेमारांचेही मोठे नुकसान झाले. जिकडे बघावे तिकडे स्थिती जलमय दिसत होती. भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्प आहेत. यात चार मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलावाचा समावेश आहे. दोन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर मध्य प्रकल्प असलेल्या चांदपूरमध्ये ७५.५३ टक्के, बघेडा ९१.८६, बेटेकर बोथली ६६.२३ व सोरणा प्रकल्प ३४.८३ टक्के असा एकुण ७१.१५ टक्के जलसाठा आहे.
ओव्हर फ्लो झालेले प्रकल्प
गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केल्याने जिल्ह्यात पूरमय परिस्थिती निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील कवलेवाडा, परसवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, टांगा, मंडनगाव, सिल्ली आंबाडी, गुढरी, रेंगेपार कोढा, एकोडी, चांदोी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, रेंगेपार कोहळी, कनेरी, चान्ना, चप्राड आणि इंदोरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
३१ लघु प्रकल्पांमध्ये ७१.७१ तर २८ जुने मालगुजारी तलावात ८९.८१ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. यापैकी आठ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के जलसाठा असून १४ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के जलसाठा आहे. १५ प्रकल्पात ७५ ते ९९ टक्के जलसाठा आहे.