ंरिमझिम पावसाने पिकांना संजीवनी
By Admin | Updated: July 22, 2015 01:15 IST2015-07-22T01:15:52+5:302015-07-22T01:15:52+5:30
परिसरात हलक्यातल्या हलक्या पावसाची कालपासून सुरुवात झाली आहे. पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

ंरिमझिम पावसाने पिकांना संजीवनी
पेरणीला आरंभ : दुबार पेरणी टळली
पालांदूर : परिसरात हलक्यातल्या हलक्या पावसाची कालपासून सुरुवात झाली आहे. पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही ठिकाणी शक्य तितक्या शेतात रोवणीस आरंभसुद्धा झाला आहे. शेतकरी, मजूर निराशेची मरगळ झटकून कामाकरिता सज्ज झाले असून रोवणीकरिता सारवासारव करताना दिसत आहेत.
मध्यप्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. पूरपरिस्थिती अनियंत्रित आहे. भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे भुरभुरी सुरु असून अधुनमधून मोठ्या सरींची अपेक्षा दिसत आहे. आकाश पूर्णत: ढगाळ आहे. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. पावसाने दमदार हजेरी लावली तर अख्ख्या १०-१२ दिवसात पालांदूर परिसरात रोवणीला विराम मिळू शकतो.
महिला मजुरांना दिवसाकाठी १०० रुपये मजुरी दिली जात आहे. हुंडापद्धतीत २,४०० रुपये प्रमाणे प्रती एकर रोवणी सुरु आहे. शेतकरी काळानुरुप बदलत असून दोरीच्या रोवणीकडे कल वाढत आहे. खताच्या मात्राही गरजेनुसार संमिश्र खताच्या मात्रा उपयोगात आणत आहेत. यातून अवास्तव खर्च टळून आवश्यक खर्चच तेवढा केला जातो. याकरिता पालांदूर मंडळ कृषी विभाग शेतकऱ्याकडे मार्गदर्शनाकरिता हजर असतो. जेवनाळा, खुनारी, घोडेझरी आदी गावात संशोधित व संकरीत धानाची शेती प्रायोगिक तत्त्वाावर कृषीविभाग राबवित आहे. निसर्ग साथ देत नसल्याने समस्यांचा सामना करताना शेतकरी कृषी कर्मचार, मजुरांना नाकीनऊ येत आहे. काल दिवसभरात १३.८ मि.मी. पावसाची नोंद नोंदविण्यात आली आहे. (वार्ताहर)