जंगलातील पाणवठे पडले कोरडे ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:33 IST2018-04-28T22:33:09+5:302018-04-28T22:33:49+5:30
मागील महिनाभरापासून नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असून या प्रकारामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.

जंगलातील पाणवठे पडले कोरडे ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मागील महिनाभरापासून नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असून या प्रकारामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.
साकोली तालुक्याला लागूनच नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा लागून आहे. राष्टÑीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. १५ दिवसांपूर्वी तीन विविध घटनेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाला लागून अनेक गावे आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी उन्हाळ्यात दिवसात पाण्याचा शोधात गावाकडे येतात. दरम्यान बरेचदा रस्ता पार करताना वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील तीन महिन्यात दहा ते बारा वन्यप्राण्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
मागीलवर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे वन्यजीवप्रेमींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तीन वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. त्यात डोंगरगाव, बोंडे, नवेगावबांध हे आहेत. डोंगरगाव वनपरिक्षेत्रात ७ बिट आहेत. तर बोडे वनपरिक्षेत्रात ८ बिट आहेत. नवेगाव वनपरिक्षेत्रात ४ वनक्षेत्र सहाय्यक आहेत. त्यात कोकणा, कोसबी, निशानी, पवनी हे आहेत. नवेगाव वन परिक्षेत्रात १३ हजार हेक्टर आर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. तर पर्यटकांना वनात वनभ्रमंती करण्यासाठी बकी, खोली व जांभळी गेट आहे. या गेटवरुन पर्यटकांना आत व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी खुला केला आहे. नवेगाव येथे १३ बिटांची निर्मिती केली आहे.
शिकारीच्या घटनांमध्ये वाढ
वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी डोंगरगाव व बोंडे वनपरिक्षेत्रात बोअरवेल आहेत. यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक झरे कोरडे पडले आहे. वन्यप्राण्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ते गावाच्या दिशेने कुच करीत आहेत. याचा फायदा शिकारी घेत आहेत.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
या परिसरातील जंगलामध्ये तेंदूपत्त्याचे प्रमाण अधिक आहे. तेंदू हंगाम चांगला येण्यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदार जंगलात आग लावतात. यंदाही जंगलात आग लावल्यामुळे शेकडो हेक्टरमधील वनसंपदेचे नुकसान झाले. त्याची झळ वन्यप्राण्यांना बसली. दिवसेंदिवस जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.