नळयोजनेपासून वंचित
By Admin | Updated: June 19, 2014 23:42 IST2014-06-19T23:42:19+5:302014-06-19T23:42:19+5:30
येदरबुची, सुंदरटोला ग्रामपंचायत येथे १३ वर्षाअगोदर जलस्वराज अंतर्गत १ कोटी खर्च करुन नळ योजनेचे निर्माण कार्य केले. परंतु अजूनही नळ योजना सुरू झाली नसून जनता प्रतिक्षेत आहे. गावामध्ये पाणी टंकी,

नळयोजनेपासून वंचित
जनतेची मागणी : योजना सुरू करा
गोबरवाही : येदरबुची, सुंदरटोला ग्रामपंचायत येथे १३ वर्षाअगोदर जलस्वराज अंतर्गत १ कोटी खर्च करुन नळ योजनेचे निर्माण कार्य केले. परंतु अजूनही नळ योजना सुरू झाली नसून जनता प्रतिक्षेत आहे. गावामध्ये पाणी टंकी, विहिर बनविली, पाईप लाईन घालण्यात आली. स्टँडपोस्ट बनविण्यात आले. परंतु आजपर्यंत गावातील जनतेला पाणी मिळणे सुरू झाले नाही.
गोबरवाही ग्रामीण विभागीय नळयोजना मागील ३४ वर्षापासून यशस्वीपणे चालविण्यात येत आहे. या योजनेची मुख्य ‘राईझिंग’ जलवाहिनी सुंदरटोला व येदरबुची गावाच्या सीमेतून येत आहे.
तालुक्यातील बावनथडी नदीपासून गोबरवाहीपर्यंत पाणी ह्याच पाईप लाईनमधून येते गोबरवाही नळ योजनेचा विस्तार दूर-दूरच्या १७ गावांमध्ये करण्यात आला असल्याची माहिती आहे.गोबरवाही जवळील सुंदरटोला, येदरबुची गावाला विस्तारित योजनेपासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तालुक्यातील सुंदरटोला, येदरबुची गावांना गोबरवाही नळयोजनेला जोडण्याची आवश्यकता आहे. ह्या योजनेला जोडल्यास त्वरित पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो.
त्याचप्रमाणे गोबरवाही ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले झोपडीपारा, हेटी, रेल्वे टोली, विद्युत कालोनी इत्यादी वॉर्ड ही नळ योजनेच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. जनप्रतिनिधी व लोकप्रतिनिधी ह्यांनी समस्येकडे लक्ष दिल्यास पाणी समस्या सोडविता येऊ शकते. (वार्ताहर)