जनसामान्यांचा विकास गावभेट संकल्पनेतून
By Admin | Updated: May 2, 2017 00:50 IST2017-05-02T00:50:10+5:302017-05-02T00:50:10+5:30
शासकीय योजनांचा लाभ सामान्य माणसाला घरपोच मिळावा या उद्देश्याने प्रशासनाने विविध विभागाच्या योजना, दाखले व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळावे....

जनसामान्यांचा विकास गावभेट संकल्पनेतून
दीपक सावंत : मुख्य ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते
भंडारा : शासकीय योजनांचा लाभ सामान्य माणसाला घरपोच मिळावा या उद्देश्याने प्रशासनाने विविध विभागाच्या योजना, दाखले व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळावे यासाठी गावभेट कार्यक्रम संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. जनसामान्यांचा विकास गावभेट संकल्पनेतून साकारण्यात येवून प्रशासन व नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढेल. या योजनेतून नागरिकांची प्रलंबित कामे मोठया प्रमाणात होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला. पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. पालकमंत्री यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते उपस्थित होते.
महाराष्ट्राला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. जलयुक्त शिवार योजनेचे दृष्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत २०१५-१६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ८६ गावांपैकी ८६ गावे शंभर टक्के ‘वॉटर न्युट्रल’ झाली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील मुख्य पिक धान असून यावर्षी किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत जिल्हयात ९ लाख ९५ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. त्यापैकी ८ लाख २० हजार क्विंटल धानाची भरडाई होऊन ५४ हजार मेट्रिक टन तांदुळाची शासनाकडून उचल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व शेतकऱ््यांनी पिक विमा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.गरीब व्यक्तीला हमखास रोजगार मिळवून देणारी योजना म्हणजे मनरेगा आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मनरेगा अंतर्गत २ लाख ६५ हजार मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. यासाठी मजूरांना ११४ कोटी रुपये वेतन मिळाले आहे. संचालन शिक्षिका स्मिता गालफाडे आणि मुकुंद ठवकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)