घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीघाट सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:42+5:30
पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे.

घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीघाट सुरू करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे. यावर प्रशासनानेच तात्काळ तोडगा काढावा व घरकुल लाभार्थ्यांकरिता रेतीघाट खुले करावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा प्रमुख बालु फुलबांधे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी पवनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पवनी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील विविध लाभार्थ्यांना घरकुले मंजुर झाले आहेत. मात्र रेतीच्या अभावामुळे अनेक घरकुल बांधकामे गेल्या काही दिवसापासून ठप्प आहेत. अतिरिक्त पैसे मोजून रेती विकत घेणे गोर, गरीबांना शक्य होत नसल्याने बांधकामे अर्धवट स्थितीत आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाची काही रक्कम देखील जमा झाली आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलाचे बांधकाम करता येत नसल्याने बांधकाम पूर्ण करण्यात अडचणी येत आहे. सध्या रेतीच्या तुटवड्यामध्ये ग्रामीण भागात रेतीचे दर हे गगनाला भिडले आहेत. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत दिली होती. मागीलवर्षी ईटगाव रेतीघाटातून लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा केला जात होता.मात्र यावर्षी रेतीघाटात पाणी असल्याने रेती काढणे अशक्य होत आहे. परिणामी अनेक घरकुलांची बांधकामे ठप्प झाल्याने रेतीघाट त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत मेश्राम तसेच तालुक्यातील शिवसैनिकांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा आहे.