रेतीच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:31+5:30
रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. तसेच रेती वाहतूकीची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेतीची अवैध वाहतूक बंद करण्यात यावे, अशा ट्रॅक्टर, ट्रक, जेसीबी चालक मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील खमाटा, टाकळी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा तालुक्यातील खमाटा टाकळी गाव वैनगंगा व सुरनदीच्या मध्यभागी आहे. येथे जुनी टाकळी रेती घाटातून ट्रॅक्टरद्वारे दिवसरात्र २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टरनी रेतीचा अवैधरित्या उपसा सुरु आहे. रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. तसेच रेती वाहतूकीची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. नागरिक भयभीत होऊन जीवन जगत आहे. त्यामुळे येथे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवासह जनावरांचा जीवही सातत्याने होणाऱ्या वाहतुकीने धोक्यात आला आहे. अनेक ट्रक चालक हे शेतकऱ्यांना रस्त्यावरील ट्रक, ट्रॅक्टर बाजूला घे असे हटकले असता अरेरावी करीत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासन रेती तस्करांच्या पाठीमागे उभे आहे का? अशी चर्चा गावातून सुरु आहे. जिल्ह्यात रेतीचा अवैध उपसा सुरुच असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. यासंदर्भात योग्य कारवाई करावी अशी मागणी खमाटा टाकळी येथील रहिवासी जयंता आस्वले यांच्यासह गावकºयांनी केली आहे.
सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी एकत्र येत भंडारा तहसीलदार, वरठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देवून समस्या मांडली. मात्र याकडे अद्यापही कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांविरुध्द तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात गौरी राघोर्ते, मंजु आस्वले, रेखा ढेंगे, वैशाली गायधने, शालांदर आस्वले, विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, कोठीराम पवणकर, राजकुमार भोपे, योगेश गायधने, धिरण भोपे, जयंता आस्वले आदींचा सहभाग होता.