देव्हाडा गावाला हागणदारी मुक्तीचा ध्यास
By Admin | Updated: January 14, 2015 23:02 IST2015-01-14T23:02:39+5:302015-01-14T23:02:39+5:30
देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती

देव्हाडा गावाला हागणदारी मुक्तीचा ध्यास
युवराज गोमासे - करडी (पालोरा)
देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची सभा बोलाविली. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करवून त्यास मंजुरी दिली गेली. गावात २८३ कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात केली.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा गावाची शौचालयाच्या बाबतीत अवस्था अवघड होती. उन्हाळ्यात उघड्यावर शौचास जायचे. पावसाळ्यात तारांबळ उडायची. महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागायचा. रात्री अंधारात जावे लागत होते. या दयनीय परिस्थितीचा सामना महिलांना करावा लागायचा. बिडीओंनी सरपंचाची कैफीयत ऐकून विस्तार अधिकाऱ्याला गावाला भेट देण्याचे निर्देश दिले.
३० डिसेंबर २०१४ रोजी खंडविकास अधिकारी डी.व्ही. आगलावे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला पंचायत विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत बोहटे, सरपंच पुष्पलता ढेंगे, उपसरपंच वंदना सोयाम, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, झगडू बुद्धे, ग्रामसेवक आर.बी. बोरकर, ग्रामपंचायत सदस्य रामानंद कांबळे, सुरेश कांबळे, छगनलाल उईके, दर्शनकुमार डोंगरे, पार्वता कांबळे, अनुरथा बुद्धे, आशा शहारे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना चौधरी, लता आरामे, गट संसाधन केंद्राचे समूह समन्वयक, निर्मूल दूत, अंगणवाडी व आरोग्य सेविका, शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने हजर होते. ३१ डिसेंबर २०१४ ते ७ जानेवारी २०१५ पर्यंत गावाचे सर्व्हेक्षण करून ८ जानेवारी रोजी पाणी व स्वच्छता बाबत जनजागृती रॅली काढून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. हागणदारी निर्मूलन आराखड्याला सर्वानुमते मंजुरी दिली गेली. गट संसाधन केंद्राचे समूह समन्यवक जी.एस. अंबुले, पी.व्ही. गणवीर यांचे मार्फत संपूर्ण गावाची परिसराची पाहणी करण्यात आली. मानवी मलमूत्र व्यवस्थापनाबद्दल नागरिकांनी माहिती जाणून घेतली. संस्था स्तरावरील इमारती, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन माहिती संकलीत केली. सामूहिक प्रयत्नांचा परिचय या गावाने दिला असून स्वयंप्रेरणेने झटणारे मोहाडी तालुक्यातील ते एकमेव गाव ठरले आहे.