एटीएम धारकांच्या रोज डझनभर तक्रारी
By Admin | Updated: May 7, 2015 00:21 IST2015-05-07T00:21:41+5:302015-05-07T00:21:41+5:30
बँक ग्राहकांना मानवी हस्तक्षेपाशिवाय आर्थिक व्यवहार करता यावा याकरीता धनयंत्राची अर्थात 'एटीएम'ची सोय ...

एटीएम धारकांच्या रोज डझनभर तक्रारी
१०० च्या नोटांची टंचाई कायमच : पैसे बाहेर न येताच मोबाईलवर डेबिटचा एसएमएस
भंडारा : बँक ग्राहकांना मानवी हस्तक्षेपाशिवाय आर्थिक व्यवहार करता यावा याकरीता धनयंत्राची अर्थात 'एटीएम'ची सोय करण्यात आली. पैसे काढणे आणि ते भरण्यासाठीही या यंत्राचा वापर केला जावू लागला. त्यामुळे माणूस प्रगतीकडे चालला, असे दिसत असतानाच आता यंत्रावर विसंभून राहिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर त्यात पैसेच नाही अथवा शंभराच्या नोटाच नाहीत, अशा सूचना वारंवार मिळत असतात. एटीएममध्ये कार्ड अडकणे, पैसे बाहेर न येताच अकांऊंटवर डेबिटचा एसएमएस येणे अशा एक ना अनेक तक्रारी बँकाकडे रोज येत असतात. (नगर प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेच्या सूचना कागदावरच
तंत्रज्ञानामुळे शक्य झालेल्या या सर्व बदलात एटीएममध्ये पैसा आणि ग्राहकांच्या सुरक्षेततेसाठी डोअर सेफ्टी कॅमेरे व सुरक्षा रक्षक असतात. मात्र ते बसविणाऱ्यांवर लक्ष ठेवणार कोण? हाही प्रश्न आता निर्माण होवू ला२गला आहे. भारतात एटीएमची सुरवात बरीच वर्ष उलटलीत मात्र आजही या यंत्रणेला परदेशातील एटीएमसारखी सर येवू शकलेली नाही. एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डचा वापर केल्यावर पैसे मशिनमधून बाहेर न येताच अकाऊंडला डेबिट पडल्याच्या अनेक तक्रारी आजही येतात. या तक्रारीच्या पार्श्वभूमिवर रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलली होती. अर्थात नियम भाराभर असले तरीही प्रत्येक्षात त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सारे गणितच विस्कळीत होते
सकाळच्या लगबगीमध्ये ग्राहक खात्यावरचे पैसे काढण्यासाठी घाईघाईत एटीएमवर जातो. तेवढ्याच तत्परतेने तो एटीएमच्या स्क्रीनवर दिसणारे सर्व आॅपशन आॅपरेट करतो. स्क्रीनवर सर्व व्यवहार पूर्ण झाल्याच्या सूचना दिल्या जातात. एटीएममधून नोटा मोजण्याचा आवाजही ऐकू येतो. एवढेच काय तर पैसे काढले गेल्याचा मॅसेज मोबाईलवर काही सेकंदातच धळकतो. प्रत्येक्षात मात्र हाती रूपयाही पडत नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच ईमरजन्सी सर्व्हिसेससाठी पेमेंट करायचे असेल तर विचारायला नको. अशावेळी तंत्रज्ञानाच्या अधिन राहून बेफिकीर बनू पाहणाऱ्या बँकांवर वचक ठेवण्याची वेळ आली आहे. एटीएममधून पैसे बाहेर न निघताच डेबिटचा एसएमएस धडकल्यानंतर ग्राहक हे बँकेत जावून याबाबतची तक्रार करतात. मात्र बँकेत गेल्यानंतरही ग्राहकाच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एटीएमचा फलक
कायम टांगलेला
राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असलेल्या अनेक बँकांचे एटीएम अनेकदा बंद अवस्थेत असतात. अनेकवेळा पैसे काढण्यासाठी गेल्यावर यंत्रात पैसेच नाहीत, अशी सूचना स्क्रीनवर धडकते. याशिवाय पैसे असले तरी शंभर आणि ५०० च्या नोटा शिल्लक नाहीत अशीही सूचना येते. त्यामुळेच १०० रूपयाच्या पटीत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दुसऱ्या एटीएमचा वापर करावा लागतो.
बॅकअप नाही, एसी बिघडला
एटीएम मशीन इंटरबँक नेटवर्कशी कनेक्टेड असते. बहुतांश एटीएमचे कार्य सॅटेलाईटच्या माध्यमातून सुरू असते. त्यामुळे कधी कधी ही लिंक मध्येच खंडित होण्यामुळेही व्यवहार अपुर्ण राहू शकतो. बॅकअप नसणे, एसीतला बिघाड अथवा एटीएम हँग होणे आदी कारणांमुळे व्यवहार पुर्ण होत नाही. त्यातही आता अनेक एटीएमचे सिक्युरिटी लॉकिंग सिस्टीमचे तीन तेरा वाजलेले दिसत असतात.