४० हजार हेक्टरमधील पीक धोक्यात
By Admin | Updated: January 19, 2015 23:59 IST2015-01-19T23:59:43+5:302015-01-19T23:59:43+5:30
वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

४० हजार हेक्टरमधील पीक धोक्यात
भंडारा : वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत. यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ११५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ११५ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ८९ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४० हजार २१७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली.
यावर्षी गहू पिकाची ९,२६५ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली. हरभरा ८,८२० हेक्टर, लाख-लाखोळी ९ हजार ३९९, पोपट ७९३, वटाना ७८१, उडीद व मुंग एक हजार ९५, इतर कडधान्य ४ हजार २९९ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली.
जवस २ हजार ७१३, मोहरी ५४, तीळ २५, गळीत पिके १ हेक्टर, एकूण गळीत धान्य ८३ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला २ हजार ९५ हेक्टर, बटाटा १९५, मिरची ७९१ तर इतर रबी पिकांची ८१३ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आली.
कृषी विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रब्बी पिकासाठी ८ हजार ६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे.
पवनी तालुक्यात ८ हजार ९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ८ हजार ३८६, मोहाडी ५ हजार ७४० पैकी ५ हजार ५९२, तुमसर ४ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ५९७ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे.
साकोली तालुक्यात ४ हजार ३३० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ५९७, लाखांदूर तालुक्यात ८ हजार ४५० हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार १४३ हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४ हजार ३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार २७ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)