दूषित पाणी पुरवठ्याचा शहरवासीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:55+5:30

नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.

Contaminated water supply hits city dwellers | दूषित पाणी पुरवठ्याचा शहरवासीयांना फटका

दूषित पाणी पुरवठ्याचा शहरवासीयांना फटका

ठळक मुद्देआजाराच्या प्रमाणात वाढ : नागरिकांची लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगेच्या होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हाप्रशासनाने यासाठी पुढाकार घेवून नदीत सोडले जाणारे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रीत करून समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरुअसल्याने पाणी मोठ्या प्रमाणात थांबून आहे. सिंचीत क्षेत्रात वाढ झाली असली तरी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे.
पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोरोनामुळे अनेकांनी पाणीखरेदी करणे बंद केले आहे त्यामुळे नगर परिषदेन शुद्ध पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. दूषीत पाणीपुरवठ्यामुळे विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता वाढली आहे. नदीकाठावर बरीच गावे आहेत. दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत.त्यामुळे नगर परिषदेन शुद्ध पाणी पुरवठा करुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याची गरज आहे.

Web Title: Contaminated water supply hits city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी