कंटेनरमध्येच जाळतात कचरा; प्रदूषणात वाढ

By Admin | Updated: May 12, 2015 00:28 IST2015-05-12T00:28:29+5:302015-05-12T00:28:29+5:30

कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने अनेक प्रभागात कंटेनर ठेवण्यात आले आहे.

The container burns garbage; Increase in pollution | कंटेनरमध्येच जाळतात कचरा; प्रदूषणात वाढ

कंटेनरमध्येच जाळतात कचरा; प्रदूषणात वाढ

भंडारा : कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने अनेक प्रभागात कंटेनर ठेवण्यात आले आहे. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच जाळला जातो. या कारणाने शहर परिसरातील काही कंटेनर भंगार झाले आहेत. तसेच ही आग अनेक दिवस सुरू राहात असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.
शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अनेक प्रभागात कंटेनर ठेवले आहेत. स्वच्छता कर्मचारीही या कामासाठी नेमले आहेत. काही नागरिक कचरा कंटेनरमध्ये जमा करतात, तर अनेक जण कंटेनरच्या बाजूलाच कचरा फेकण्यात धन्यता मानतात. भरलेल्या कंटेनरमधील कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही अनेकदा या कंटेनरमध्येच आग लावली जाते. हा प्रकार शहरातील बहुतेक ठिकाणी नजरेस पडतो. त्यामुळे जवळपास सर्वच कंटेनरला दिलेला पिवळा रंग जळून कंटेनर जंगून भंगार होत चालले आहे. नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे राहते. प्लास्टिकचा कचऱ्याचे विघटन होत नाही. त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठया प्रमाणात होते. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे. कंटेनरच्या चारही बाजूला घरे राहतात. अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरतो. अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणे कठीण होऊन बसते. प्लास्टिकसारख्या घातक पदार्थ्यांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे नागरिक ही आग आम्ही लावत नसल्याचे गळा ओरडून सांगत प्रशासनाकडे बोट दाखवतात तर परिषदेचे कर्मचारी नागरिकांकडे बोट दाखवतात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही. कंटेनरच्या आसपासच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यांवर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कंटेनरचे किमान आयुष्य आठ ते दहा वर्ष असते. मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे वर्षभरातच कंटेनर भंगार झाले आहेत. लावलेली आग अनेक दिवस तशीच सुरू राहते. अशा वेळी अन्नाच्या शोधात कुत्रे, बकरी अशी जनावरे त्यात पडल्यास जीवानिशी जातात. उन्हाळ्याच्या दिवसात यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देत हा प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)

शहरातील अनेक कंटेनर झाले भंगार
कंटेनरमधील कचरा न फेकता त्याला सरळ आग लावून देण्याचा प्रकार सर्वच ठिकाणी होत असल्याने कंटेनरचा पिवळा पेंट जळून कटेनर जंगले आहे. पर्यायाने ते भंगार होत चालले आहे.
बरेच कंटेनर आता खिळखिळे झाले असून त्यातील कचरा बाहेर सांडतो. प्लास्टिक कचरा यात सर्वाधिक असल्याने प्रदूषण वाढले आहे.
लावलेली आग अनेक दिवस तशीच सुरू राहते. अशा वेळी अन्नाच्या शोधात कुत्रे, बकरी अशी जनावरे त्यात पडल्यास जीवानिशी जातात. कंटेनरमध्ये आग लावतं कोण हे कोडं असून नागरिक प्रशासनाकडे तर न. प. नागरिकांकडे बोट दाखिवत आहे.

Web Title: The container burns garbage; Increase in pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.