ग्रामीण भागातूनही हरवतोय चुलीवरचा गोडवा
By Admin | Updated: June 3, 2015 00:50 IST2015-06-03T00:50:23+5:302015-06-03T00:50:23+5:30
शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे.

ग्रामीण भागातूनही हरवतोय चुलीवरचा गोडवा
हौसेपुरत्या उरल्या चुली, आधुनिकतेचा अवलंब, गोवऱ्याही झाल्या नामशेष
मोहाडी : शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावांमध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे.
स्वयंपाक घरातील चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. पूर्वी ग्रामीण भागात गोधन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरोघरी गोवऱ्या थापल्या जायच्या. पावसाळा गोवऱ्याच्या भरवशावर निघून जायचा. जंगलातून सरपण आणण्याचीही तेवढी गरज नव्हती. आता मात्र गावातही गोवऱ्यांपासून स्वयंपाक करणे कमी झाले असून केवळ पानगे करण्यापुरत्याच गोवऱ्या वापरल्या जातात. शिवाय तुराट्या, पऱ्हाट्याही शेतातच स्वाहा केल्या जातात. आधी या इंधनाचे भट्टे रचले जायचे.
झाडे तोडण्याची गरजही पडत नव्हती. चुलीवरचा स्वयंपाक हा मंद आणि हळू शिजत असतो. त्यामुळे त्यात अन्न कच्चे राहण्याची शक्यताही नसते. अर्धा स्वयंपाक तर निखाऱ्यावरच होऊन जात असे. केवळ हौसेपुरत्या घरी चुली राहिल्या आहेत. भाकर खावी तर चुलीवरची अशी म्हण आजही सर्वत्र प्रचलित आहे. परंतु आता गॅसवरच भाकर केली जात असल्याने ती तेवढी कडक होत नाही. परिणामी त्याचाही गोडवा हरवत चालला आहे. लग्नसमारंभात केवळ भातुकलीचा खेळ मांडण्यापुरतीच चूक बांधली जात असून त्या पद्धतीचाही विसर पडत आहे. आधुनिकतेमुळे शहरी भागातील लोन आता ग्रामीणांमध्ये दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)