कालवा फुटल्याने चितापूर रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:53 IST2018-08-22T21:53:18+5:302018-08-22T21:53:35+5:30
उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटून माती डांबरी रस्त्यावर आल्याने चितापूर रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

कालवा फुटल्याने चितापूर रस्ता बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव (दिघोरी) : उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटून माती डांबरी रस्त्यावर आल्याने चितापूर रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
भंडारा तालुक्यातील करचखेडा येथे उपसा सिंचन योजना आहे. संततधार पावसाने आमगाव जवळील चितापूर मार्गावरील कालवा फुटला. या कालव्यातील माती चितापूर डांबरी रस्त्यावर पसरली. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे येणे करणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील माती हटविण्याची मागणी वारंवार करूनही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. या कालव्याचे काम नव्यानेच झाले आहे. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि संततधार पावसामुळे वामन सार्वे यांच्या शेताजवळ हा कालवा फुटला. गत काही दिवसांपासून या कालव्यातील माती रस्त्यावर येवून तेथे चिखल तयार झाला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असून अपघातही घडतात. आतातर या रस्त्यावरील वाहतूकच ठप्प झाली आहे.