नाल्यात सोडले रासायनिक पाणी
By Admin | Updated: July 19, 2016 00:39 IST2016-07-19T00:39:00+5:302016-07-19T00:39:00+5:30
देव्हाडी शिवारताील एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक विषारी पाणी नाल्यात पुन्हा सोडले.

नाल्यात सोडले रासायनिक पाणी
व्यवस्थापनाची मुजोरी : शेतकऱ्यांवर नापिकीचे संकट
तुमसर : देव्हाडी शिवारताील एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक विषारी पाणी नाल्यात पुन्हा सोडले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष असून नाल्यातील पाणी रोवणीकरिता कसे वापर करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
प्रदुषण निंयत्रण मंडळाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुमसर - गोंदिया राज्य महामार्गाशेजारी देव्हाडी शिवारात औषधांची भूकटी तयार करणारा कारखाना मागील २८ वर्षापासून आहे. या कारखान्याशेजारी एक मोठा नाला आहे. नाल्याच्यावर कारखान्याचे दोन कृत्रिम हौद लहान तलाव आहे.
येथे रासायनिक पाणी निरप्रभ निर्जंतूक करणारी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे रासायनिक पाणी नष्ट करण्यात येते, परंतु दररोज मोठ्या प्रमाणात या कारखान्यात औषध तयार करण्याकरिता पाण्याचा वापर करण्यात येतो हे पाणी जवळील नाल्यात सोडले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. भातपिकांना पाणी देणे शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. देव्हाडी शिवारात रोवणीची कामे जोमात सुरु आहेत. शेतात पाणी कमी असल्याने जवळील नाल्यातून पंपाद्वारे पाणी घेणे सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या कारखान्यातून पुन्हा रासायनिक पाणी सोडण्यात आले. पाण्याला दुर्गंधी येत असून पाणी तेलकट झाले आहे. तेलाचा थर पाण्यावर तरंगतांनी येथे नाल्यात दिसत आहे.
१० दिवसांपूर्वी येथे कारखान्यातून रासायनिक पाणी सोडले होते. दोन दिवसानंतर चौकशी भेट म्हणून प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पथक आले होते. अशी माहिती शेतकऱ्यांनी लोकमतला दिली. मागील २८ वर्षापासून रासायनिक पाणी नाल्यात सोडणे सुरु आहे. परंतु अद्यापपावेतो कोणतीच कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही.
रासायनिक पाण्याचा सर्वात जास्त फटका पावसाळ्यात शेतकऱ्यांना बसतो. ऐरवी हिवाळा व उन्हाळ्यात पाण्याची गरज येथे नसते. त्यामुळे कारखान्याचे येथे फावते. दोन वर्षापूर्वी रासायनिक विषारी पाणी धान पिकांना येथील शेतकऱ्यांनी दिले होते.
धान विक्री केल्यावर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला बोलावून धान परत केले होते. धान भरडाई नंतर तांदळाची मोठी दुर्गंधी तांदळातून येत होती. अशी माहिती शेतकरी महेश बिरणवारे यांनी दिली.
देव्हाडी शिवारातील फेकून दिले होते. या समस्येकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे. प्रशासनही येथे दखल घेत नाही. दोन दिवसात अन्यायग्रस्त शेतकरी तुमसर येथे तहसिलदारांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. शेतकऱ्यांचा येथे उद्रेक होऊ शकतो. (तालुका प्रतिनिधी)